दोन गटातील कलहाने
एक विशाल मेळ्याला जन्म दिला.
-प.पू.लोकनाथ स्वामी
फार प्राचीन गोष्ट आहे. एकदा दुर्वासा मुनी इंद्राला भेटण्यासाठी स्वर्गात गेले. इंद्र त्यावेळी आपल्या राजसी थाटात ऐरावत हत्तीवरून तेथून जात होता. इंद्राला पाहून दुर्वासा मुनींनी प्रसन्नतापूर्वक आपल्या गळ्यातील पुष्पमाला त्यांच्याकडे फेकली. गर्वाने फुललेल्या इंद्राने त्याचा सम्मान न करता ती माळा हत्तीच्या सोंडेला घातली. पशुबुद्धीमुळे हत्तीने त्या माळेचे महत्व न जाणल्याने ती पुष्पमाळा आपल्या पायाखाली तुडवून टाकली. या अपमानामुळे क्रोधित दुर्वासा मुनींनी समस्त देवतांना ऐश्वर्यहीन होण्याचा शाप दिला. एकीकडे आसुरांबरोबर युद्ध आणि दुसरीकडे दुर्वासा मुनींच्या शापामुळे देवता आपले ऐश्वर्य हरवून बसल्यावर देवतागणांनी भगवान श्री विष्णूंकडे मदतीची याचना केली.
भगवंतांनी त्यांना काही काळासाठी आसुरांशी तह करण्यासाठी सांगितले तसेच आसुरांबरोबर अमृत प्राप्त करण्यासाठी क्षीरसागराचे मंथन करण्याचा सल्ला दिला. हे अमृत देवता आणि आसुरांमध्ये वाटले जाणार होते.
सर्प-मूषक न्याय
भगवान विष्णू नेहमी धर्मपरायण देवतांचे रक्षण करतात आणि ते आसुरांद्वारे ब्रह्मांडावर प्रभुत्व गाजविले जाणे थांबवू इच्छितात. यास्तव भगवंतांनी देवतांना आसुरांबरोबर ‘सर्प-मूषक’ न्यायानुसार कार्य करण्यास सांगितले. एकदा साप आणि उंदिर एका टोकरीत अडकून बसले. साप उंदराला म्हणाला, “हे पाहा, मी तुला सहजपणे खाऊन टाकू शकतो; परंतु सध्या मला या टोकरीतून बाहेर पडणे महत्वाचे आहे. त्यामुळे तू या टोकरीला भोक पाडलेस तर आपण दोघेही त्यातून बाहेर पडू शकतो.” उंदराला ही युक्ती आवडली आणि तो टोकरीला छिद्र पाडू लागला. परंतु, साप बाहेर पडण्याइतके छिद्र मोठे होताच सापाने उंदराला गिळले आणि तो टोकरीतून बाहेर पडला.
भगवान विष्णूंच्या उपदेशाचे पालन करीत देवता आसुरांच्या राजाकडे जाऊन तह केला. तद्नंतर ते क्षीरसागराचे मंथन करण्यासाठी निघाले. विशाल मंदार पर्वताला मथनी तसेच वासुकी सर्पाला दोरखंड बनविण्यात आले.
मंथनावेळी असूर वासुकीच्या अग्रभागाला पकडण्यासाठी अडून बसले आणि भगवान विष्णूंद्वारा प्रोत्साहीत केल्यावर देवतागण वासुकीची शेपूट पकडून मंथन करू लागले. मंथन सुरू होताच वासुकीच्या मुखातून आगीच्या ज्वाळांमुळे असूर भाजून निघू लागले.
मंथन सुरू असताना आधाररहित विशाल मंदार पर्वत क्षीरसागराच्या तळाशी जाऊ लागला. तेव्हा भगवंत एका कासवाचे रूप धारण करून तेथे प्रकटले. त्यांनी आपल्या पाठीवर पर्वताला धारण केल्याने मंथनाचे कार्य पुढे चालू राहिले. श्रीमद्भागवतात भगवंतांच्या या लीलेमागील कारण वर्णन करताना सांगते की त्यावेळी भगवंतांच्या पाठीला खाज सुटली असल्याने ती मिटविण्यासाठी त्यांनी हे रूप धारण केले. पर्वताच्या पाठीवर रगडले गेल्यामुळे त्यांना त्यामुळे बरे वाटले.
मंथनाचे फळ
सर्वप्रथम मंथनातून भयंकर हलाहल विष प्रकट झाले आणि त्याचा प्रभाव चारी दिशांना पसरू लागला. देवतांनी भयभीत होऊन भगवंतांचा आश्रय घेतला. यावेळी करुणावश भगवान शंकरांनी संपूर्ण विषाला आपल्या ओंजळीत धारण करून पान करीत ते आपल्या कंठात धारण केले. विषाच्या प्रभावामुळे त्यांच्या कंठावर निळ्या रंगाच्या रेखा अंकीत होतात आणि ते त्यांचे आभुषण बनते. यास्तव त्यांचे ‘नीळकंठ’ असेही एक नाव पडले.
भगवान शंकर विषपान करीत असताना त्यांच्या ओंजळीतील विषाचे काही थेंब खाली पडले. ते विष विभिन्न वृक्ष, सर्प, नाग, विंचू इत्यादी प्राण्यांनी प्राशन केल्याने त्याच्या प्रभावामुळे ते विषारी बनले.
हलाहल विषानंतर अनेकानेक ऐश्वर्यशाली वस्तू समुद्रातून प्रकट झाल्या ज्यांना दोन्ही दलांनी आपापसात वाटून घेतल्या. तद्नंतर भगवान धन्वंतरी हळूहळू समुद्रातून प्रकट झाले. त्यांच्या सुंदर सुशोभित हातामध्ये अमृताने भरलेला एक कलश होता.
सर्वजण या अमृताचीच प्रतिक्षा करीत होते. आसुरांनी त्वरित कलश हिसकावून घेतला आणि त्यांच्यात आधी कोण अमृतपान करणार, याविषयावरून वादविवाद सुरू झाला. अशा प्रकारे ते आपापसात लढत असताना भगवंत एक अत्यंत सुंदर युवतीच्या रूपात, मोहिनीमूर्तीचे रूप धारण करून तेथे प्रकट झाले.
मोहिनीदेवी म्हणाली, “देवतागण अत्यंत कंजूस आहेत आणि प्रथम अमृतपान करण्यासाठी आतुर आहेत. त्यामुळे त्यांना पहिला अमृत पिऊ द्या. तुम्ही त्यांच्याप्रमाणे नसल्याने तुम्ही थोडी प्रतिक्षा करू शकता. तुम्ही सर्वजण वीर आहात. म्हणून देवतांद्वारे अमृतपान करेपर्यंत प्रतिक्षा करणे तुमच्यासाठी लाभप्रद ठरेल.”
मोहिनीच्या वचनांनी मंत्रमुग्ध झालेल्या आसुरांनी अमृतकलश तिच्या हातात सोपविला असता तिने त्वरित देवतांना ते अमृत वाटण्यास सुरू केले.
हळूहळू आसुरांना त्यांच्याशी धोका होत असल्याचे समजू लागल्याने त्यांनी पूर्ण शक्तिनिशी देवतांवर आक्रमण केले. स्कंद पुराणानुसार इंद्राचा पुत्र, जयंताने हा कुंभ आपल्या ताब्यात घेऊन स्वर्गाच्या दिशेने उडून गेला. बारा वर्षांच्या या युद्धात जयंताने या कुंभाला चार ठिकाणी ठेवले – प्रयाग, उज्जैन, नासिक आणि हरिद्वार. असे म्हटले जाते की यावेळी अमृताचे काही थेंब या ठिकाणी पडल्याने दर बारा वर्षांनी येथे होणार्या कुंभमेळ्यात हे अमृत पुन: प्रकट होते आणि येथील पवित्र जळात स्नान करणार्यांना ते लाभान्वित करते.
देवता आणि आसुरांमधील युद्धा बारा वर्षांपर्यंत चालल्याने या ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरत असतो.