हो का पुत्र पत्नी बंधू। त्यांचा तोडावा संबंधु॥1॥
कळो आले खट्याळसे। शिवो नये लिंपो दोषे॥2॥
फोडावे मडके। मेले लेखी घाये एके॥3॥
तुका म्हणे त्यागे।बीण चुकी जे ना भोगे॥4॥
अर्थ : भगवद्प्राप्तीसाठी पुत्र, पत्नी, बंधू कोणीही असो, त्यांचा संबंध तोडावा. जर ते दुराचारी आहेत असे आपल्यास आढळ्यास त्यांना स्पर्शदेखील करू नये, कारण त्यांच्या स्पर्शामुळे दोष आपल्यामध्ये येतात. ती सर्व मेली आहेत, असे समजून त्यांच्या नावाने मडके फोडून त्यांना संबंध सोडून द्यावा. तुकाराम महाराज म्हणतात, “असा त्याग केल्याशिवाय संसारातील भोग संपणार नाहीत.
तात्पर्य : हा अभंग आजच्या आपल्या समाज मान्यतेप्रमाणे कठोर असला तरी त्यामागील आशय समजून घेणे महत्वाचे आहे. भगवद्गीतेमध्ये (13.10) भगवान श्रीकृष्ण सांगतात, असक्तिरनभिष्वङ्ग पुत्रदारगृहादिषु – “घरदार, पत्नी, मुलेबाळे इत्यादींपासून अनासक्ती, हे ज्ञानाचे लक्षण आहे.” यावरून असे समजू नये की, मनुष्याला त्यांच्याविषयी भावना, प्रेम असू नये. हे सर्व आपल्या स्वाभाविक प्रीतीचे विषय आहेत. स्वत: तुकाराम महाराजांना पत्नी, मुलेबाळे, घरदार, संतार होता. कर्तव्य पालन करणे आणि आसक्त असणे, यात फरक आहे. जर आपली आसक्ती भगवंतांवर असेल तर आपोआपच सर्व कर्तव्ये अगदी पती-पत्नी संबंध, पुत्र-कन्या, परिवार हे सर्व भगवंतांचे आहेत, या भावनेने केली असेल तर आपण अनासक्तच आहोत. त्यासाठी घरातील सर्व व्यक्तींनी एकत्र बसून हरिनाम जप करावा, कीर्तन करावे, गीता-भागवत शास्त्रांचा अभ्यास करावा आणि त्यातील उपदेशांचे आपल्या जीवनात पालन करून आपले मन आणि भावना शुद्ध करावी. घरामध्ये भगवंतांची सेवा करून त्यांना आपण जे काही सेवन करतो, ते सर्व अर्पण करून त्यांचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा. याप्रमाणे भगवंतांवरील आसक्ती वाढवली की पर्यायाने या संसाराची आसक्ती नाहीशी होते. हे सर्व करताना जाणीव असावी की आपल्याला प्रिय असलेला देह आणि त्यासंबंधीत वस्तू – पत्नी, पत्नी, मुलेबाळे, घरदार इत्यादी तात्पुरत्या आहेत. आपली इच्छा नसली तरी त्याचा त्याग आपल्याला एक ना एक दिवस करावाच लागणार आहेत. म्हणून मनुष्य जीवनाचे ध्येय हे भगवद्प्राप्ती आहे, हे जाणून जीवनातील कर्तव्ये केल्यास घरातील सर्वांनाच त्याचा लाभ होईल. हेच खरे कुटुंबावरील प्रेम आहे. या जगातील आसक्ती ही एका वृक्षाच्या खोल गेलेल्या मूळासारखी आहे. याबाबत भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत (15.3) सांगतात, अश्वत्थमेनं सुविरुढमूळ-मसङ्गशस्त्रेण दृढेन छित्वा। – “मनुष्याने खोलवर मूळे गेलेल्या वृक्षाला अनासक्तीरूपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे.” यासंबंधी मनामध्ये कोणताही गोंधळ असल्यास अनासक्त अशा हरिभक्तिपरायण भक्ताकडून मार्गदर्शन घ्यावे.
दुराचारी व्यक्ती म्हणजे भगवंतांपासून दूर गेलेला व्यक्ती. अशा व्यक्तींच्या संगतीमध्ये राहिल्यास आपली हरिभक्ती निश्चितच संथ होईल आणि कालांतराने नष्ट होण्याची देखील शक्यता असते. म्हणून अशा व्यक्तींसा संग टाळण्यास शास्त्र आणि साधुसंतही सांगतात, मग ते आपले नातेवाई, मित्र, हितचिंतक कोणीही असो. संगत टाळण्याचा अर्थ त्यांच्याशी संबंध ठेवू नये असे नाही, तर त्यांच्या भौतिक, इंद्रियतृप्तीविषयक आकर्षणांमध्ये आपण ओढले जाऊ नये, याची काळजी घेणे. दैनंदिन व्यवहारामध्ये आपण लोकांपासून दूर राहू शकत नाही; पण त्यांच्या प्रभावापासून निश्चितच दूर राहू शकतो. या जगामध्ये हरिभक्तांनी कसे वागावे, याबद्दल भागवतात (7.14.6) सांगितले आहे,
ज्ञातय: पितरौ पुत्र भ्रातर: सुहृदोऽपरे।
यद्वदन्ति यदिच्छन्ति चानुमोदेत निर्मम:॥
“मानवी समाजातील अशा बुद्धिमान मनुष्याने अतिशय साधेपणाने जीवन जगावे. जर त्याला मित्र, अपत्ये, पालक व इतरांकडून काही सूचना मिळाल्या तर बाह्यत: या सूचनांचे पालन करून ‘होय, हेच योग्य आहे’ असे म्हणावे; पण त्याने आपले जीवन अधिक कष्टदायी करण्याविषयी आतून दृढनिश्चयी असावे, कारण कष्टदायी जीवनामुळे मनुष्य जीवनाचे ध्येय (हरिभक्ती’ प्राप्त होऊ शकत नाही.”