READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944E

टेबल ऑफ़ कंटेंट्स

कुंभमेळा

मराठी प्रीमियम

6

मिनिटे



श्रद्धा, तपस्या, भक्ति आणि एकतेचा मेळा



चार करोड साधुसंत, संन्यासी तसेच व्यापारी, गृहिणी आणि शेतकरी, शिक्षक आणि विद्यार्थी, वैज्ञानिक आणि अंधविश्वासी, कवी आणि राजनेतागण, योगी आणि भिखारी…या सर्वांमध्ये कोणती गोष्ट सामान्य आहे? अमर बनण्याची इच्छा. याशिवाय दुसरी कोणती गोष्ट असेल जी या सर्वांना चाळीस दिवसांपर्यंत अत्यंत गर्दी असलेल्या नदीतटावर खेचून आणते?



कुंभमेळा असा कार्यक्रम आहे जेथे न केवळ पृथ्वीवरील सर्वाधिक मनुष्यांचा जमाव एकत्रित होतो, याबरोबर ते भगवंतांच्या शुद्ध भक्तांमध्ये गहन आध्यात्मिक भावनांना देखील प्रेरीत करते. मान्यता आहे की गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमात विशेष तिथींना स्नान केल्याने व्यक्ती असंख्य पापांतून मुक्त होऊन जन्म-मृत्यूच्या दुस्तर चक्रातून मुक्त होतो. म्हणून कुंभमेळ्यात असंख्य लोकांच्या जमावाला सतत नदीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे दिसून येते. करताळ, घंटा, ढोल इत्यादी वाद्यांनी सुसज्जित अनेक समुहाद्वांरे ‘बोला गंगा मैया की जय! बोलो यमुना मैया की जय! हा जयघोष सर्वत्र ऐकू येतो.



शाही स्नानावेळी जात-पात, उच्च-नीज तसेच विभिन्न मते आणि संप्रदायांतील सर्व भेद जणू गंगाजळात एकत्र एकत्र येऊन वाहून जातात. येथे प्रत्येक व्यक्ती आपले शरीर तसेच आत्म्याला शुद्ध करू इच्छितो. संपूर्ण भारत तसेच जगातून आलेले लोक त्यांच्या अध्यात्मातील श्रद्धा आणि उत्कंठेचे प्रमाण देतात. याबाबत श्रील प्रभुपाद एकदा म्हणाले होते – 



कुंभमेळ्यात लाखो लोक गंगास्नान करण्यासाठी येतात, कारण ते आध्यात्मिक प्रगती करून या भौतिक जगातून मुक्त होऊ इच्छितात. ते आळशी नाहीत. ते हजारो मैलांचा प्रवास करीत प्रयागपर्यंत येतात. सध्याच्या आधुनिक युगातील भागदौडीत ते सामिल नसले तरी ते आळशी नाहीत. गीता सांगते – या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी – “साधारण व्यक्तीसाठी रात्र असते तेव्हा आत्मसंयमी व्यक्तीसाठी ती जागृतावस्था असते.” आत्मसंयमी व्यक्ती सकाळी लवकर उठून आध्यात्मिक साक्षात्कारासाठी कार्य करतो, मात्र यावेळी इतर सामान्य लोक झोपलेले असतात. मात्र, दिवसा गाढवाप्रमाणे राबणारे लोक विचार करतात, “आम्ही इतके कठीण परिश्रम करीत आहोत; परंतु हे भक्त काहीच करीत नाहीत.”



खरेतर, भारताकडे आध्यात्मिकतेचा इतका अतुलनीय वारसा आहे ज्याद्वारे संपूर्ण विश्व खर्‍या सुख-समृद्धीला प्राप्त करू शकते. आणि, हा वारसा आपणास लहानपणापासून मिळाला आहे. श्रील प्रभुपाद एकदा म्हणाले होते, “भारतीय प्रशिक्षित आहेत. येथे जन्मत:च संस्कार प्राप्त होत असल्याने भारतवर्षाला पुण्यभूमी म्हटले आहे. आजदेखील आपण पाहू शकता की कुंभमेळ्यादरम्यान लाखो लोक गंगेत स्नान करण्यासाठी येतात, कारण ते जाणतात की गंगास्नान करणे एक पुण्यकार्य आहे. तेव्हा भारतीय लोकांच्या नसांतून आध्यात्मिकता वाहत आहे. दुर्भाग्याने सद्य नेते त्यांना मार्गभ्रष्ट करीत असल्याने आत्ताची प्रजा नास्तिक बनत चालली आहे. ही अत्यंत दुर्भाग्याची गोष्ट आहे.” (प्रवचन, दिल्ली – 13 नोव्हेंबर, 1973)



ऐतिहासिक प्रमाण 



काहींच्या अनुसार कुंभमेळा हिंदू एकतेचे प्रतीक आहे आणि आठव्या शतकात बौद्ध, जैन तसेच इस्लामच्या प्रभावामुळे हिंदू समाप्त होण्याचा धोका निर्माण झाल्यावर श्रीपाद शंकराचार्यांनी कुंभमेळ्यात नियमितरूपाने समस्त आध्यात्मवाद्यांना एकजुट होण्याचा विचार मांडला. काहींनुसार शंकराचार्यांनीच कुंभमेळ्याची स्थापना केली; परंतु शंकराचार्यांपूर्वी पार पडलेल्या अनेक मेळ्यांचे शास्त्रीय प्रमाण या धारणेला निरस्त करतात.



कुंभमेळ्यात साधू तसेच विद्वान दोघांनाही आपल्याकडे आकर्षित करण्याची चुंबकीय शक्ती आहे. 302 ई. पू. ग्रीसचे महान इतिहासतज्ञ, मैगस्थनीजने प्रयाग कुंभमेळ्यात 75 दिवस व्यतीत केल्याचा उल्लेख केला आहे. त्यांच्यानुसार त्यावेळी 25 लाख लोकांनी या कुंभमेळ्यात भाग घेतला होता. नंतर सातव्या शतकात महान सम्राट हर्ष यांनी विख्यात विद्वान ह्यूसांग यांना कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले. आपल्या दैनंदिनीमध्ये ह्यूसांग सम्राट हर्षांच्या उदाहरणीय आध्यात्मिक नेतृत्वाची प्रशंसा करीत लिहितात – “महोत्सवाच्या समापनावेळी सम्राट हर्ष यांनी मुक्तहस्ते गरजूंना संपत्ती दान केली, अगदी त्यांनी अंगावरील वस्त्रालंकार देखील दान दिले.”



19व्या शतकाच्या शेवटी झालेले प्रसिद्ध इंग्रजी लेखक, मार्क ट्वेन आपल्या ‘मोर ट्रैम्पस् अब्रॉड’ (1895) पुस्तकात लिहितात – 



हे यात्रेकरू संपूर्ण भारतातून आले होते. यातील काहींनी तर महिन्याभर चालत प्रवास करीत विषम हवामानाचा मार, धूळ, जीर्ण वस्त्रे, भूख इत्यादी सहन केले आहे. परंतु, त्यांचा अतूट विश्वास त्यांच्यासाठी प्रेरणा होते. हे अत्यंत अद्भुत होते की श्रद्धेची शक्ती कशाप्रकारे लाखो लोक, वृद्ध, युवक, मुले सर्वांना कोणतीही तक्रार न करता अशी अविश्वसनीय यात्रा करण्याचे प्रेरणा देत होती. ते ही यात्रा का करीत होते, हे मला माहीत नाही. काहीही असो, त्यांचे हे कार्य आमच्यासारख्या गोर्‍या चमडीच्या लोकांना विस्मयकारी आणि कल्पनेच्या पलीकडील होते.



कुंभमेळ्याचा उद्देश 



कुंभमेळ्यात विशेष तिथींना असणार्‍या स्नानांना सर्वाधिक महत्व आहे. पण, कुंभमेळ्यासारख्या आध्यात्मिक उत्सवांचा उद्देश केवळ पवित्र स्नान नसून त्याहून काही अधिक आहे. खरेतर, कुंभमेळा एक विशाल सत्संग आहे. कुंभमेळ्यात आपण आत्मज्ञानी व्यक्तीच्या शोधात जाण्यात आपल्या जीवनाचे खरे सार्थक आहे. अन्यथा, श्रीमद्भागवत (10.84.13) सांगते, यत्तीर्थबुद्धिः सलिले न कर्हिचिज्जनेष्वभिज्ञेषु स एव गोखरः  – कुंभमेळ्याचा उद्देश केवळ पवित्र स्नान करणे आहे, असे मानणारा मनुष्य हा गाय किंवा गाढवाप्रमाणे पशुबुद्धीचा आहे. परंतु, खरा बुद्धिमान व्यक्ती विचार करतो, “येथे इतक्या साधुंचा मेळावा जमला आहे. मला त्यांच्याकडून आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केले पाहिजे.” हा कुंभमेळ्याचा मुख्य उद्देश आहे.



शास्त्रांनुसार लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करून आपली पापे त्यांच्यात सोडून येतात. कुंभमेळ्यात करोडो लोक नद्यांमध्ये स्नानसाठी येत असल्याने यावेळी या नद्यांना त्यांच्या पापांच्या भारामुळे त्रास होऊ लागतो. युगांपूर्वी गंगादेवीने भूतलावर येण्यापूर्वी आपली ही चिंता भगवंतांसमोर व्यक्ती केली होती. त्यावेळी भगवंतांनी तिला विश्वास दिला की भविष्यात अनेक भगवद्भक्त देखील गंगास्नान करतील आणि ते गंगेला त्या पापांपासून मुक्त करतील. यावरून सिद्ध होते की भगवद्भक्तांमध्ये पवित्र तीर्थांना देखील पावन करण्याची क्षमता आहे. श्रीमद्भागवतात (1.13.10) युधिष्ठिर महाराज विदुरांना म्हणतात, “हे प्रभू! आपणासारखे महापुरुष स्वत: तीर्थ आहेत. आपण भगवान श्रीकृष्णांना आपल्या हृदयात धारण केले असल्याने आपण तीर्थांना देखील पवित्र करणारे आहात.”



या श्लोकाच्या तात्पर्यात श्रील प्रभुपाद लिहितात – 



भूमंडळातील समस्त तीर्थांचा उद्देश शुद्ध भक्तांच्या उपस्थितीमुळे निर्माण झालेल्या आध्यात्मिक वातावरणाद्वारा मनुष्याच्या दूषित चेतनेला शुद्ध करणे आहे. तीर्थाटन करणार्‍या व्यक्तीने तेथील शुद्ध भक्तांचा शोध घेतला पाहिजे, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे, त्यांच्या निर्देशांचे आपल्या जीवनात पालन करण्याचा प्रयत्न करावा आणि अशा प्रकारे हळूहळू स्वत:ला मुक्ती अर्थात भगवद्धामात परतण्यासाठी तयार करावे. केवळ गंगा, यमुनेसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला तीर्थयात्रा म्हणत नाहीत. व्यक्तीने विदुरांसारख्या महाजनांचा शोध घेतला पाहिजे, ज्यांच्या जीवनात भगवंतांच्या सेवेव्यतिरीक्त इतर कोणतीही इच्छा नाही. 



भक्तांविषयी सांगावे तर, ते कुंभमेळ्यात श्रीकृष्णांच्या महिमांचा प्रचार करण्यासाठी कुंभमेळ्यात जातात. 1977 सालच्या कुंभमेळ्यात श्रील प्रभुपादांनी स्पष्ट केले होते- 



भगवंतांचे गुणगान करणे, हाच केवळ आपला एकमेव उद्देश आहे. आम्ही पुस्तके लिहित आहोत, पत्रिका प्रकाशित करीत आहोत, प्रचार करीत आहोत, प्रचारासाठी जगभर फिरत आहोत – सर्व काही केवळ भगवान श्रीकृष्णांचे गुणगान करण्यासाठीच. हेच आमचे एकमात्र कार्य आहे. अशा प्रकारे स्वत:ला श्रीकृष्णांच्या कार्यात संलग्न ठेवावे. आम्ही या कुंभमेळ्यात केवळ भगवंतांचे गुणगान करण्यासाठी आलेलो आहोत, जेणेकरून लोक या आंदोलनाचे महत्व जाणू शकतील. याशिवाय आमचा येथे येण्यामागील दुसरा कोणताही उद्देश नाही. 



प्रयागमध्ये अमावस्येला प्रभातकालीन स्नानाला सर्वाधिक पुण्यदायक मानले जाते. यावेळी बृहस्पती वृष राशीत तर सूर्य आणि चंद्र दोघे मकर राशीत असतात. कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली जाते. सरकार शेकडो एकर भूखंडावर एका तात्पुरत्या शहराचे निर्माण करते – यामध्ये यात्रेकरूंच्या निवासाठी हजारो तंबू, हॉस्पिटल, बाजार, पाण्याची व्यवस्था आणि अगदी तात्पुरते रेल्वे स्टेशन देखील उभारले जाते. त्रिवेणीवर नदीच्या दोन किनार्‍यांना जोडणारा एक तात्पुरता पुल देखील निर्माण केला जातो. या दरम्यान इस्कॉन देखील आपल्या प्रचार कार्यान्तर्गत श्रील प्रभुपादांच्या ग्रंथांचे वितरण तसेच प्रसादवितरण करते. 



प्रयागचे महत्व



‘प्रयाग’ म्हणजे असे ठिकाण जेथे मोठमोठे यज्ञ संपन्न होतात. युगांपूर्वी ब्रह्मदेवांनी यज्ञ करण्यासाठी या क्षेत्राची निवड केली होती जेथे गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन पवित्र नद्यांच्या संगम होतो. या ठिकाणालाच प्रयाग म्हणतात. 1573 साली सम्राट अकबराने येथे एक विशाल किल्ला निर्माण केला आणि नगराचे नाम बदलून अलाहबाद असे ठेवले. काही वर्षांपूर्वी उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री मा. श्री आदित्यनाथ योगी यांनी या पवित्र धामाचे महत्व पुन: प्रस्थापित करीत याचे पुन्हा ‘प्रयाग’ असे नाव ठेवले.



तीन नद्यांच्या संगमाला त्रिवेणी म्हटले जाते. येथे निळ्या, श्यामल रंगाची यमुना धूसर गंगेत मिळते आणि सरस्वती भूमिगत वाहते. 



यापैकी कोणत्याही नदीत स्नान करणे पावनकरी आहे; परंतु म्हटले जाते की यांच्या संगमाच्या ठिकाणी स्नान केल्याने मनुष्याला शंभरपट अधिक लाभ होतो. वराह पुराणात सांगितले आहे – प्रयाग येथील त्रिवेणी संगमात स्नान केल्याने व्यक्तीला स्वर्गप्राप्ती होते आणि तेथे शरीर सोडल्यास मुक्ती प्राप्त होते. हे समस्त तीर्थांचा राजा असल्याने ते भगवान श्रीविष्णूंना अत्यंत प्रिय आहे.”



ब्रह्मदेवांनी सांगितले, प्रयागस्य पापं नश्यन्ति तत्क्षणम् – “प्रयाग क्षेत्रात प्रवेश करताच समस्त पाप नष्ट होतात.”



अनेक महान संत, ऋषी-मुनींनी प्रयागची यात्रा केली आहे. श्री चैतन्य महाप्रभू, श्री नित्यानंद प्रभू आणि श्री अद्वैताचार्य सर्वांनी आपल्या यात्रांदरम्यान प्रयागची यात्रा केली आहे. 



कुंभमेळा आणि भौतिक संसार 



आपण या भौतिक जगात भोग करण्याच्या इच्छेने प्रवेश केला आहे. आपणास ही सुविधा देण्यासाठी श्रीकृष्णांचे परमात्मा स्वरूप देखील आपल्या शरीरात उपस्थित होतात. हे एका उदाहरणाद्वारे आपण समजू शकतो. ज्याप्रमाणे कुंभमेळ्यात लाखो लोक येतात आणि सरकार त्यांच्यासाठी आवश्यक सुविधांची व्यवस्था करते. त्याकाळात तेथे एक छोटे प्रशासन नेमण्यात येते आणि एक कमिशनर, मॅजिस्ट्रेट इत्यादी सर्वजण तेथील व्यवस्थापन करण्यासाठी जातात. त्यांचा उद्देश असतो की यात्रीकरूंना कोणतीही असुविधा न होवो आणि ते शांतीपूर्वक स्नान करू शकतील. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांचे सरकार आहे. आपणास भौतिक जगात भोग घ्यावयाचा असल्याने त्यांनी अनेक सुविधांची निर्मिती केली आहे. अनेकदा लोक प्रश्न विचारतात, “या भौतिक संसाराची निर्मिती का करण्यात आली आहे?” त्याची निर्मिती आपल्यासाठी केली आहे. काही जीवांना भौतिक जगात भोग करण्याची इच्छा असल्याचे श्रीकृष्ण जाणत असल्याने त्यांनी या भौतिक जगाची निर्मिती केली. हे भौतिक जग आध्यात्मिक जगताचे प्रतिबिंब आहे, पण अशाश्वत, तात्पुरते आहे – जशी कुंभमेळ्यात तंबू इत्यादींची तात्पुरती व्यवस्था केली जाते. भूत्वा भूत्वा प्रतिलयते (गीता 8.19). येथे जीवात्म्यांना भोग करण्याच्या संधीबरोबर वैदिक ज्ञान समजण्याची संधी देखील दिली जाते, ज्याचे पालन करून ते पुन: भगवद्धामात परतू शकतात.



(श्रील प्रभुपाद प्रवचन, वृंदावन, 10 नोव्हेंर -1972)

Spread the love

टेबल ऑफ़ कंटेंट्स

रिलेटेड आर्टिकल

Explore Other Articles

Scroll to Top