जरी हे तीन भक्त भक्तिमार्गातून पथभ्रष्ट झाले, तरी श्रीकृष्णांच्या
अहैतुकी कृपेमुळे ते परमपदाची प्राप्ती करू शकले.
– ब्रजनाथ दास
भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीतेच्या उपदेशाद्वारे त्याला तसेच समस्त लोकांना आपल्याप्रति समर्पित होण्याचे आवाहन केले आहे. श्रीकृष्णांनी आपणास अल्पस्वातंत्र्य दिले असल्याने आपण त्यांचा आश्रय घ्यावा अथवा नाही याची आपण निवड करू शकतो. परंतु, भगवद्गीतेत ते स्वत:पर्यंत पोहोचण्याचा अत्यंत सोपा आणि प्रभावशाली मार्ग सांगतात, “सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग करून केवळ मलाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, तू भयभीत होऊ नकोस.” (18.66)
भगवद्गीतेते भगवंतांनी काही वचने दिली आहे आणि त्यांनी आपल्या लीलांदरम्यान ही सर्व वचने पूर्ण देखील केली आहेत. आपले वचन पूर्ण करून त्यांनी आपला विश्वास संपादन केला आहे आणि आपणास प्रेम आणि भक्तिपूर्वक त्यांना शरण जाण्यास प्रेरित केले आहे. भगवंतांच्या हृदयात आपल्या भक्तांसाठी अपार प्रेम आणि करुणा आहे. भगवद्गीतेत त्यांनी दिलेली ही वचने आणि त्यांच्या लीला या गोष्टीची पुष्टी करतात. यावरून सिद्ध होते की भगवंत आपल्या भक्तांसाठी वचनबद्ध आहेत.
श्रीकृष्ण गीतेत (9.31) एक वचन देतात-
क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छन्तिं निगच्छति।
कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त: प्रणश्यति॥
“तो लवकरच धर्मात्मा (सदाचारी) होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. हे कौंतेय! निर्भय हो आणि घोषणा कर, माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही.”
या श्लोकातील दोन शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे – भवति (बनतो) आणि निगच्छति (प्राप्त करतो). हे शब्द सिद्ध करतात की अधर्म अथवा पापकार्यांमध्ये संलग्न झाल्यानंतर भगवद्भक्त शोक करीत वारंवार श्रीकृष्णांचे स्मरण करतो आणि अशा प्रकारे तो धर्ममार्गावर पुन: स्थित होतो. ही गोष्ट कृष्णभक्तीच्या परिवर्तनकारी शक्तीकडे निर्देशित करते. यामुळे अगदी पापी व्यक्ती देखील भक्तीद्वारा आपल्या पापांतून मुक्त होऊ शकतो. आपल्या दोषांचा स्वीकार करून श्रीकृष्णांच्या कृपेची याचना केल्याने व्यक्तीचे हृदय शुद्ध होऊ लागते आणि श्रीकृष्णांबरोबरील त्याचा संबंध पुन:प्रस्थापित होतो.
व्यक्ती कितीही पतित असलो तरी भक्तीमार्गाच्या पालनामुळे त्याचा उद्धार होतो आणि मृत्युपश्चात त्याला निम्नयोनीमध्ये प्रवेश करावा लागत नाही. हे भक्तीच्या अद्भुत शक्तीचे प्रमाण आहे. गीतेमध्ये दिलेल्या वचनांनुसार भगवंतांनी खालील काही लीला केल्या आहेत.
अजामिळाचे रक्षण
श्रीमद्भागवताच्या सहाव्या स्कंधात अजामिळाची कथा येते. लहानपणापासून त्याला ब्राह्मणाचे संस्कार तसेच भगवद्भक्तीचे प्रशिक्षण मिळाले होते. परंतु, जेव्हा त्याने एका शूद्र व्यक्तीला वेश्येला आलिंगन देताना पाहिले, तेव्हा हे दृश्य पाहून त्याच्या मनात तीव्र कामवासना जागृत झाली. यामुळे वशीभूत झाल्याने त्याने सर्व विधीनियमांचा त्याग करून त्या वेश्येशी विवाह करून दहा पुत्रांना जन्म दिला. यापैकी सर्वात लहान मुलाचे नाव त्याने ‘नारायण’ असे ठेवले. त्याला या लहान मुलाप्रति अत्यंत आसक्ती होती.
अजामिळाच्या मृत्यूची वेळ आली असता यमदूत त्याच्यासमोर उभे राहिले. या अक्राळ-विक्राळ यमदूतांना पाहून अजामिळ अत्यंत घाबरून गेला आणि उच्चस्वरात आपल्या लहान मुलाला हाक मारू लागला, “नारायण! नारायण!…” जरी तो आपल्या मुलाला हाक मारीत होता, तरी ते भगवंतांचे एक नाम असल्याने तत्काळ तेथे विष्णुदूत उभे राहिले. त्यांना यमदूतांना अजामिळास घेऊन जाण्यापासून थांबविले. विष्णुदूतांनी सांगितले की, अजामिळाने केवळ या जन्मातील नव्हे तर गत लाखो जन्मांत केलेल्या पापांचे देखील प्रायश्चित केले आहे. त्याने मृत्यूवेळी अगदी नि:सहाय्य भावात भगवान श्री नारायणांच्या पवित्र नामांचे उच्चारण केले आहे.
मृत्यूवेळी नि:सहाय्य भावात भगवान नारायणांच्या पवित्र नामांचे उच्चारण केल्याने भगवंतांनी अजामिळाला भक्ती करण्याची दुसरी संधी प्रदान केली. काही वेळानंतर पुन्हा बाह्य चेतनेत परतल्यावर अजामिळाला सर्व काही समजले. तो त्वरित हरिद्वारला गेला आणि तेथे आपले जीवन पूर्णपणे भक्तीमध्ये संलग्न करून जीवनाच्या अंती भगवद्धामाची प्राप्ती केली.
श्रीकृष्णांद्वारा अजामिळाचे रक्षण दर्शविते की भलेही भक्ताने अजाणतेपणे भगवान श्रीकृष्णांच्या नामांचे उच्चारण केले तरी देखील श्रीकृष्ण त्याला आपली अद्भुत कृपा प्रदान करतात. यावरून सिद्ध होते की श्रीकृष्णांचा भक्त कधीच नष्ट होत नाही.
अजामिळ आपल्या युवावस्थेत अत्यंत सज्जन भक्त होता; परंतु आपल्या इंद्रियांवर नियंत्रण न करू शकल्यामुळे त्याचे पापकार्यांमध्ये पतन झाले. श्रीकृष्ण प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात परमात्मारूपात विराजमान आहेत आणि त्यांनीच अजामिळाला आपल्या सर्वात लहान पुत्राचे नाव ‘नारायण’ असे ठेवण्यासाठी प्रेरीत केले असेल. अजामिळाचे आपल्या लहान मुलावर अत्यंत प्रेम असल्याने तो नेहमी ‘नारायण! नारायण!’ असे त्याला हाक मारायचा. अशा प्रकारे अजाणतेपणे भगवान नारायणांच्या पवित्र नामाचा जप केल्याने प्राप्त अज्ञात सुकृतीमुळे मृत्यूवेळी त्याची या भयानक संकटातून रक्षण झाले. परिणामत: अंतत: त्याला भगवद्प्राप्ती झाली.
अजामिळाच्या माध्यमातून भगवंतांनी हे स्थापित केले की हरिनाम संकीर्तनाच्या तुलनेत इतर कोणतीही आध्यात्मिक साधना अथवा कार्य तितके प्रभावशाली नाही. नंतर यमराजांनी यमदूतांना सांगितले, “अशा प्रकारे हा निष्कर्ष निघतो की भगवंतांच्या पवित्र नामांचा तसेच त्यांच्या गुण-लीलांचे कीर्तन केल्याने मनुष्य सहजपणे पापकर्मांच्या फळांतून मुक्त होतो. पापकार्यांना समूळत: नष्ट करण्यासाठी हीच एकमात्र पद्धती आहे. भलेही व्यक्ती अशुद्ध रीतीने भगवंतांच्या नामांचे उच्चारण करीत असला तरी अंतत: तो सांसारिक बंधनातून मुक्त होईल. मात्र, यासाठी जप अथवा कीर्तन निरापराध भावनेत करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, अजामिळ अत्यंत पापी होता; परंतु मृत्यूवेळी त्याने केवळ भगवन्नामाचे उच्चारण केले. तेव्हा तो आपल्या पुत्राला हाक मारीत होता, पण त्यांच्या तोंडून भगवन्नाम निघत असल्यामुळे त्याला पूर्ण मुक्ती प्राप्त झाली.” (भागवत 6.3.24)
श्रीकृष्ण परम कृपाळू आणि सर्वशक्तिशाली आहेत. ते हवे ते करू शकतात. म्हणून जर मृत्यूवेळी पापी मनुष्य देखील अंत:करणापासून श्रीकृष्णांच्या नामांचे उच्चारण करीत असेल, तेव्हा भलेही नामोच्चाराद्वारा श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करण्याचा त्याचा हेतू नसला तरी श्रीकृष्ण त्याला मुक्ती प्रदान करतात. गीतेत (8.5) ते सांगतात, “अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देहत्याग करतो, तो तत्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, यात मुळीच संशय नाही.” या अध्यायात श्रीकृष्ण अशा योग्याचे वर्णन करतात जो आजीवन श्रीकृष्णांचे स्मरण करण्याचा प्रयत्न करतो. आणि, हा श्लोक (8.5) या वर्णनाच्या आधी येतो. परंतु, अशा पापी व्यक्तीची गती काय ज्याने जीवनभर श्रीकृष्णांचे स्मरण केले नाही आणि अजामिळासमान मृत्यूवेळी असाह्य होऊन तीव्रतापूर्वक श्रीकृष्णांचे स्मरण केले असेल? श्रीकृष्ण हवे तर त्याला देखील आध्यात्मिक जगात निवास प्रदान करू शकतात. आपल्यासारखे साधक मृत्यूवेळी श्रीकृष्णांचे स्मरण करू शकतील का? जर जीवनातील संकटांमध्ये आपणास श्रीकृष्णांचे स्मरण होत असेल तर शक्य आहे की मृत्यूवेळी देखील आपण श्रीकृष्णांचे स्मरण करू शकू.
गजेंद्र मोक्ष
श्रीमद्भागवताच्या आठव्या स्कंधात गजेंद्र नामक हत्तीची कथा येते. पूर्व जन्मात गजेंद्र इंद्रद्युम्न नामक एक महान राजा तसेच भगवंतांचा अनन्य भक्त होता. राजकारभारातून निवृत्त झाल्यावर इंद्रद्युम्न महाराज तपस्या करण्यासाठी मलय पर्वतांवर निघून गेले. एकदा अगस्त्य मुनी राजाच्या कुटीसमोरून जात होते. तेव्हा राजा भगवद्प्रेमाच्या अवस्थेत असल्याने ते बाह्य चेतनेत स्थित नव्हते. मुनींचे स्वागत करणे त्यांचा धर्म होता; परंतु त्यांना अगस्त्यांच्या आगमनाचा आभास न झाल्याने त्यांच्याकडून मुनींची उपेक्षा झाली. या शिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याचे पाहून अगस्त्य मुनींनी राजाला पुढील जन्मात हत्तीचा देह मिळण्याचा शाप दिला. शुद्ध भक्त प्रत्येक गोष्टीकडे भगवंतांचा आशीर्वाद म्हणून पाहतो. आपण समजू शकतो की राजाला हत्तीचा देह मिळण्याचा शाप देण्यामागे श्रीकृष्णांचीच विशेष योजना होती. श्रीकृष्ण भूत, वर्तमान, भविष्याला जाणतात. (गीता 7.26) ते जाणत होते की इंद्रद्युम्न हत्तीच्या शरीरात जन्मल्यावर एक मगरीच्या जबड्यात ते पकडले जातील, जेणेकरून ते असहाय्य भावात भगवंतांचा पूर्ण आश्रय स्वीकार करतील.
मगरीने गजेंद्रावर आक्रमण केले असता दीर्घकाळ संघर्ष केल्यावर अंतत: गजेंद्राची शक्ती क्षीण झाली. तेव्हा त्याने पूर्व जन्मात कंठस्थ केलेली भगवंतांची स्तुती गाण्यास सुरू केले. तत्क्षणी भगवंत तेथे प्रकट झाले आणि गजेंद्राला मगरीच्या तावडीतून मुक्त करण्याबरोबर त्याला जन्म-मृत्यूच्या चक्रातून देखील कायमस्वरूपी मुक्त केले. जीवनभर गजेंद्राला वाटत होते की तो सुखपूर्वक आपल्या परिजनांसमवेत इंद्रियभोग करेल. परंतु, पाण्यातील मगरीशी संघर्ष करताना त्याने पाहिले की कोणीही त्याची मदत करू शकत नव्हते. तेव्हा स्वत: आपले रक्षण करणे अथवा प्रियजनांद्वारे रक्षण केले जाण्याच्या सर्व आशा त्याने सोडून दिल्या. परंतु, तो अत्यंत सौभाग्यशाली होता, यावेळी त्याने अनन्य भावात भगवंतांचा आश्रय स्वीकारला असता स्वत: भगवंतांनी त्याचे रक्षण केले.
गजेंद्र केवळ या संकटातून बाहेर पडू इच्छित नव्हता. भगवंतांना प्रार्थना करीत तो म्हणाला, “मगरीच्या तावडीतून मुक्त झाल्यावर मला आणखी जीवन जगायचे नाही. या हत्तीच्या शरीराचा काय लाभ, जे आतून-बाहेरून तमोगुणाद्वारे आच्छादित आहे? मला अज्ञानाच्या या सर्व अवरणांपासून मुक्त व्हायचे आहे. हे अज्ञान काळाच्या प्रभावाने देखील नष्ट होत नाही.” (भागवत 8.3.25)
अशा प्रकारे अगस्त्य मुनींचा शाप वरदान ठरला. ही कथा अत्यंत महत्वपूर्ण आहे, कारण ही खरेतर आपणासर्वांची स्थिती आहे. स्वभाविकपणे आपण सर्वजण या जगातील मोहमायेमध्ये सुख, सुरक्षा आणि आश्रयाचा शोध घेत असतो. आपण स्मरणात ठेवले पाहिजे की या भौतिक जगरूपी सरोवरात आपण नेहमीच काळरूपी मगरीच्या जबड्यात अडकलेले आहोत. केवळ कृष्णभक्तीच यातून मुक्त होण्यासाठी आपली मदत करू शकते.
भरत महाराज
श्रीमद्भागवताच्या पाचव्या स्कंधात भरत महाराजांची कथा येते. ते संपूर्ण पृथ्वी चे सम्राट होते आणि त्यांच्या नावाने ही संपूर्ण पृथ्वी ‘भारतवर्ष’ नामाने विख्यात झाली. योग्यवेळी त्यांनी आपला राज्यकारभाराचा त्याग करून भगवद्प्राप्ती करण्यासाठी पुलहाश्रम नामक वनात निवास करू लागले. त्यांनी हे स्थान यासाठी निवडले कारण येथे भजन करणार्या लोकांवर भगवंत विशेष कृपा करीत असत. अशी या ठिकाणाची ख्याती होती.
योगाच्या नियमांचे कठोरपणे पालन करीत भरत भावभक्तीच्या स्तरापर्यंत पोहोचले. या अवस्थेत साधक दिव्यानंदाचा अनुभव करू लागतो. परंतु, आई गमाविलेल्या हरणाच्या पिल्लाप्रति अत्यधिक स्नेहामुळे त्यांचे या उच्च स्तरावरून पतन झाले. या पिल्लाचे रक्षण करण्यात कोणताही दोष नव्हता; परंतु त्याच्या आत्म्याच्या कल्याणाचा अधिक विचार न करता केवळ त्याच्या शरीराप्रति करुणा दाखविल्यामुळे श्रीकृष्णांना ते विसरून गेले. हा त्यांचा खरा दोष होता. भरत महाराजांनी त्याचे रक्षण केल्यावर त्याला पुन्हा इतर हरणांच्या कळपात सोडू शकले असते. पण, त्यांनी तसे केले नाही. ते विचार करू लागले, “मी या हरणाचा रक्षक आहे’ आणि अशा प्रकारे त्याची काळजी घेण्यात ते इतके तल्लिन झाले की त्यांचे आध्यात्मिक साधनेकडे दुर्लक्ष झाले.
मृत्यूवेळी श्रीकृष्णांचे स्मरण करण्याऐवजी भरत महाराज हरणाचे स्मरण करीत असल्याने त्यांना पुढील जन्मी हरणाचा शरीरात जन्म मिळाला. भगवंत गीतेत (8.6) सांगतात, “हे कौंतेय! आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो, त्या त्या भावाची तो नि:संदेह प्राप्ती करतो.”
भरत महाराजांची निष्ठा जाणून श्रीकृष्णांनी त्यांना पुन्हा एक संधी दिली. हरणाच्या शरीरात देखील त्यांना पूर्वजन्मातील घटनांचे स्मरण राहिले. हरणाच्या शरीरानंतर त्यांना पुन्हा एका सदाचारी ब्राह्मणाच्या घरात मनुष्य शरीर प्राप्त झाले. आपल्या चुकीतून धडा घेत त्यांनी समस्त भौतिक आसक्तींचा त्याग करून अंतत: मोक्षप्राप्ती केली.
भरत महाराजांची कथा आपणास चार महत्वपूर्ण शिकवणी देते – 1. आध्यात्मिक जीवनाचे पालन केल्याने आपल्या चित्तात स्वाभाविकपणे करुणेचा उदय होतो. आपण त्याचा विचारपूर्वक उपयोग केला पाहिजे. 2. आपली भक्ती कधीच नष्ट होत नाही. काही कारणास्तव आपले पतन झाल्यास भगवद्कृपेद्वारे आपणास सिद्धी प्राप्त करण्याची पुन: संधी दिली जाते. 3. जीवनात योग्य मार्गदर्शन करणार्या भक्तांचा संग आवश्यक आहे. 4. परोपकारासाठी आपले जीवन श्रीकृष्णांप्रति समर्पित केले पाहिजे.
श्रीकृष्णांच्या कृपेसाठी पात्र
आपल्या भक्तिमय जीवनात क्षणिक उतार-चढाव आल्यानंतर देखील हे तीन महाजन अत्यंत सौभाग्यशाली ठरले आणि त्यांना श्रीकृष्णांची कृपा प्राप्त झाली. यामागील एक कारण आणखी की त्यांनी कधीच हरिनामाप्रति अपराध केला नाही. परिणामत: त्यांना कृष्णभक्ती पुन: जागृत करून भगवद्धामाची प्राप्ती करण्याची संधी मिळाली.
भलेही आपल्यामध्ये अनेक दोष असले तरी आपण निराश होऊ नये. आपण एक गोष्ट जाणली पाहिजे की कृष्णभक्तीद्वारेच एक पापी व्यक्ती देखील महान संत बनू शकतो. आपले गुरू आणि श्रीकृष्ण निश्चितपणे आपली मदत करतील, जेणेकरून आपली पुन: श्रीकृष्णांची भेट होईल. जो व्यक्ती अंत:करणापासून एकदातरी भगवंतांची प्रार्थना करतो, तेव्हा भगवंत त्याला कधीच विसरत नाहीत. अंतत: भगवद्कृपेने अशा व्यक्तीचा उद्धार निश्चितपणे होतो.
ब्रजनाथ दास (पी.एच.डी.) आणि त्यांची पत्नी सुवर्ण राधा देवी दासी (पी.एच.डी.) हे दोघे प. पू. राधानाथ स्वामींचे शिष्य आहेत. ते आपल्या दोन मुलींसमवेत कोलोरॅडो, अमेरिका येथे निवास करतात. ते ग्रंथ वितरणाबरोबर इस्कॉन डेन्व्हर येथील श्री श्री राधा गोविंद विग्रहांची सेवा देखील करतात.
उरिींळेप भरत महाराज राज्यकारभार त्यागून वनात राहू लागले आणि उच्च साधनेद्वारे पूर्णपणे भगवद्चेतनेत स्थित झाले.