आपण पैशांना किती महत्व देतो, ते कसे कमवितो आणि कशा
प्रकारे खर्च करतो – हे सर्व आपल्या आंतरिक भावनांना दर्शविते.
श्रील प्रभुपाद लिहितात, “धन एका ठिकाणी कधीच थांबत नाही. ते एका व्यक्तीच्या हातातून दुसर्या व्यक्तीच्या हातात जाते. अंतत: कोणीच धनाचा भोग करू शकत नाही आणि ते भगवंतांच्याच शक्तीच्या रूपात कायम राहते.” (श्रीमद्भागवत 5.14,24 – तात्पर्य) धन ही भगवंतांची शक्ती आहे. त्यांनी ते निर्माण केले आहे, तेच त्याचे स्वामी आहेत आणि तेच त्याला नियंत्रित करतात – “या जगातील व्यक्त अथवा अव्यक्त जे काही आहे ते भगवंतांच्या मालकीचे आहे आणि त्यांच्याद्वारा नियंत्रित आहे.” (ईशोपनिषद – मंत्र 1)
श्रीकृष्ण निर्धारित करतात की आपणास किती धन प्राप्त होईल. असे वाटू शकते की संयोगवश एक व्यक्ती धनी कुटूंबात जन्म घेतो तर दुसरा गरीब कुटूंबात; एक व्यक्ती गरीबीतून धनी बनतो आणि इतरांना ते जमत नाही – परंतु, हे सर्व श्रीकृष्णांद्वारे निर्मित कर्मांच्या नियमांच्या अंतर्गत पार पडत असते. श्रील प्रभुपाद सांगतात, “प्रत्येक व्यक्ती विचार करीत आहे, ‘मी लोभी बनल्यास मला अधिक धन प्राप्त होईल,’ पण हे शक्य नाही. आपल्या भाग्याहून अधिक एक पैसा देखील आपणास मिळणार नाही.” (प्रवचन, 3 ऑक्टोबर – 1973) आणि, ते लिहितात, “अधिक धन एकत्रित करण्याचा प्रयत्न करून एखादा व्यक्ती अधिक धनाचा संचय करू शकत नाही. असे असते तर सर्वजण समानरूपाने धनी बनले असते. आपणास धन प्राप्त होणार नाही. खरेतर, सर्वजण धनार्जन करण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यांच्या पूर्व निर्धारित कर्मांनुसार त्यांना धनप्राप्ती होते.” (श्रीमद्भागवत 3.27.8 – तात्पर्य)
आधुनिक समाज या गैरसमजुतीखाली कार्य करीत आहे की जर आपण अधिक परिश्रम केले तर आपणास अधिक धनप्राप्ती होईल. आणि, या धनाद्वारे आपण कोणतीही वस्तू खरेदी करू शकत असल्याने आपण धनप्राप्तीद्वारे सुखी होऊ. परंतु, खरे सुख धनाद्वारे प्राप्त इंद्रियसुखाच्या तुलनेत दुसरीच गोष्ट आहे. हेच कारण आहे की, लोकांकडे इंद्रियभोगाची सर्व साधने असली तरी ते असंतुष्ट आणि नैराश्याचे जीवन जगत आहेत. त्यामुळे धनाद्वारे सुखप्राप्ती होते, हे काही खरे नाही.
या कटूसत्याकडे ध्यान दिल्याशिवाय आपल्यापैकी अनेक धन प्राप्त करून सुख मिळविण्याची आशा करतात. अधिकांश लोक आपल्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी अधिकाधिक धन प्राप्त केल्यानंतर देखील संतुष्ट होत नाही, का? कारण त्यांना आणखी अधिक धन हवे आहे. श्रीमद्भागवत (4.22.33) सांगते,
“आत्मसाक्षात्काराशिवाय इतर विषय अधिक प्रिय मानणे, हाच स्वत:चा स्वार्थ साधण्यामागील सर्वात मोठा अडथळा होय. आत्मकल्याणाच्या मार्गामध्ये याहून मोठा कोणताही अडथळा नाही.”
वर्तमान युगात धनच व्यक्तीची प्रतिष्ठा, प्रभुत्व आणि सफलतेचे सूचक बनलेले आहे, भले व्यक्तीकडे चांगला व्यवहार, चांगले गुण नसले तरी चालतील.
धन आणि आपले अज्ञानपूर्ण व्यक्तीत्व
जेव्हा आपण विचार करतो की काही भौतिक परिस्थितींमध्ये बदल घडवून आपण सुखी होऊ शकतो, तेव्हा लोभ आपणास जखडून टाकतो. श्रीकृष्ण सांगतात की नारकाच्या तीन द्वारांपैकी एक लोभ आहे आणि इतर दोन म्हणजे काम आणि क्रोध. आपण विचार करतो, “आज माझ्याकडे इतके धन आहे आणि माझ्या योजनांनुसार मी आणखी धन प्राप्त करीन.” (गीता 16.13) धनाच्या लालसेमुळे व्यक्ती आपल्या मित्र आणि नातेवाईकांशी देखील आपला संबंध तोडून टाकतो. श्रील प्रभुपाद लिहितात, “अनेकदा बद्धजीव आध्यात्मिक प्रगतीसाठी भक्तांच्या संगतीत असतो, तरी धनाची गरज पडल्यास तो धोका देऊन चोरीदेखील करतो. आणि, एखाद्याने दुसर्याला अगदी थोड्या पैशांसाठी देखील धोका देतो, तेव्हा तो त्याचा शत्रू बनतो.”
आपल्या इंद्रियांच्या वेगांवर नियंत्रण नसणे आणि धनाची लालसेपोटी आपण इच्छांरूपी न शमणार्या अग्नीमध्ये जळत राहतो. अशा प्रकारे आपल्या जीवनाची गुणवत्ता घटून आपण निरंतर दु:ख भोगीत राहतो. श्रील प्रभुपाद लिहितात,
सरकारद्वारा अनेक प्रकारच्या करवसुली नियमांच्या माध्यमातून कंजूस नागरिकांकडील बेकायदेशील संचित धन हिसकावून भावी युद्धासाठी एकत्रित केले जात आहे. हा विनाशकार्यासाठी धनाचा व्यर्थ प्रयोग आहे. एकेकाळी नागरीक तितक्याच धनात संतुष्ट रहात जितके त्यांच्या उपजीविकेसाठी आवश्यक आहे आणि उर्वरित वेळात आध्यात्मिक प्रगती करू शकतील, कारण या दोन्ही गोष्टी मनुष्य जीवनासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. परंतु, ते दिवस आता राहिले नाहीत. आता प्रत्येक व्यक्ती अग्नीप्रमाणे भडकलेल्या अनेक इच्छांच्या संतुष्टीसाठी असीमित धन गोळा करण्यासाठी धडपडत आहे. लोकांनी या चुकीच्या इच्छापूर्तींसाठी एकत्र केलेले धन मायेच्या प्रतिनिधींद्वारे हिसकावून नेले जाते. मायेचे हे प्रतिनिधी आहेत – डॉक्टर, वकील, करवसुली अधिकारी, समाज, तथाकथित साधू, अकाळ, भूकंप आणि इतर अनेक संकटे… खरेतर हाच प्रकृतीचा नियम आहे. जर धन भगवंतांच्या सेवेत नियुक्त केले नाही तर त्याचा खर्च न्यायालयीन खटले, आजारपण इत्यादींसाठी करावा लागेल. मूर्ख लोकांकडे या तथ्यांकडे पाहण्यासाठी डोळे नाहीत. म्हणून भगवंतांचे नियम त्यांना मूर्ख बनवितात. (कृष्णभावनेच्या दिशेने, अध्याय 2)
अशा प्रकारचा भौतिक लोभ आपला अंतरंग भाग नाही आणि शिवाय आपले अस्तित्व व्यापार आणि बँक-बॅलेंस अथवा आपल्या भौतिक उपलब्धींद्वारे स्वत:ची ओळख करून देण्यासाठी आहे. धन आणि अनेक वस्तूंप्रती आपली आसक्ती आपल्या शक्तींचा अयोग्य वापर आहे.
ज्ञानयुक्त व्यक्तीत्व
आपण सखोलपणे आत्मविश्लेषण केले तर आढळेल की आपणासर्वांना जन्म-मृत्यू आणि सामाजिक जबाबदार्यांपासून मुक्त व्हायचे आहे. आपण मानव शरीररूपी प्राप्त उच्च उत्तरदायित्व देखील निभावू इच्छितो. मनाच्या एका कोपर्यात आपण जाणतो की आपणास एक बहुमूल्य भेट प्राप्त झाली आहे आणि आपणास वचनबद्धता तसेच सेवेद्वारा त्याचे पालन करायचे आहे. धनामागे वेडा झालेला व्यक्ती जीवनातील ही बहुमूल्य संधी गमावून बसतो आणि परिणामत: दु:खांनी वेढला जातो. परंतु, आपण धनाचा योग्य वापर करू शकतो, या धनाला भगवंतांच्या सेवेत नियुक्त करून. आणि, असे केल्याने हेच धन आपल्या नुकसानीचे कारण न बनता आपली खरी संपत्ती बनेल.
श्रील प्रभुपाद लिहितात, “भौतिक प्रकृतीद्वारा निर्मित प्रत्येक वस्तू भगवंतांच्या सेवेत नियुक्त केली जाऊ शकते आणि हे जीवात्म्याचे अभिन्न अंग आहे. भगवंतांचा शुद्ध भक्त शुद्ध सेवाभावाद्वारे प्रत्येक वस्तूला आध्यात्मीकृत करण्याची कला जाणतो….” (श्रीमद्भागवत 2.1.10 – तात्पर्य) मुद्द्याची गोष्ट अशी, मी खरोखरच भगवंतांनी दिलेले धन त्यांच्या सेवेत करीत आहे अथवा स्वत:च्या इंद्रियतृप्तीसाठी करीत आहे, हे जाणणे. आपल्याकडे किती धन हे महत्वपूर्ण नाही, पण आपली चेतना महत्वाची आहे. श्रील प्रभुपाद सांगतात,
अनेक वस्तूंचा मालक होण्याचा अर्थ नाही की तो व्यक्ती भौतिकवादी असेल. वास्तविक तथ्य असे आहे की संपूर्ण जगातील वस्तू जवळ बाळगून देखील एखादा व्यक्ती आध्यात्मिक असू शकतो, आणि काहीही धन नसताना देखील एक व्यक्ती पूर्णपणे भौतिकवादी असू शकतो. हे सर्व चेतनेवर निर्भर आहे. या जगातील सर्व वस्तू जवळ बाळगलेला व्यक्ती कृष्णभावनाभावित असेल तर तो खरा अध्यात्मवादी आहे, मात्र दुसर्या व्यक्तीने सर्व काही त्यागले असले मात्र त्याच्यात कृष्णभावनेचा अभाव असेल तर तो मोठा भौतिकवादी आहे. (पत्र, 23 एप्रिल- 1970)
धन आणि आपले कार्य
वैदिक समाज लोकांना चार भागांमध्ये विभाजित करतो – ब्राह्मण (शिक्षक), क्षत्रिय (शासक), वैश्य (शेतकरी आणि व्यापारी) आणि शूद्र (कामगार). प्रत्येक समूह धनाशी वेगवेगळ्या प्रकारे व्यवहार करतो. वैदिक समाजात ब्राह्मण आपल्या विद्यार्थ्यांकडून धन स्वीकारत; परंतु अत्यंत कमी गरजा असल्याने ते आवश्यक तेवढ्या गोष्टींचाच स्वीकार करीत. उर्वरित धन ते दान देऊन टाकत. ब्राह्मण ऐश्वर्यशाली जीवन जगण्यासाठी कधीच धनाचा संचय करीत नाही, मात्र क्षत्रिय आणि वैश्य तसे करू शकतात. ब्राह्मण सदैव तपस्येचे जीवन जगतो, कारण तो नेहमी लक्षात ठेवतो की धन अगदी सहजरीत्या व्यक्तीचे मन भौतिकवादाकडे खेचू शकते.
क्षत्रियांना शासन करायचे असल्याने त्यांना प्रतिष्ठा आणि धनाची आवश्यकता असते. परंतु, त्यांचा तसेच इतर धनसंग्रह करणार्या लोकांचे कर्तव्य आहे की त्यांनी उदारपणे त्याचे दान देखील करावे.
वैश्य हे कृषी-गोरक्षा तसेच वाणिज्याद्वारे धन कमवितात. अन्न तसेच इतर गरजेच्या वस्तू निर्माण करून वैश्य इतरांवर निर्भर न राहता आपले तसेच आपल्या कुटूंबाचे पोषण करतात.
परंपरागत शूद्रांना धन दिले जात नाही, मात्र इतर तीन वर्ग त्यांच्या सेवेच्या मोबदल्यात त्यांना भोजन, निवासस्थान आणि वस्त्रे प्रदान करतात. त्यांना पुरेसे प्रमाणात या वस्तू दिल्या जात जेणेकरून ते सुखी राहू शकतील. ज्या व्यक्तीला आध्यात्मिक प्रशिक्षण तसेच ज्ञान मिळत नाही त्याला शूद्र म्हटले जाते. या व्याख्येनुसार आजच्या युगातील जवळजवळ सर्वचजण शूद्र आहेत. आपण पाहू शकतो की लोकांकडे धन येताच ते काय करू लागतात – ते सर्व प्रकारच्या पापकार्यांत पैसे उडवून टाकतात. आणि, अधिकाधिक धन प्राप्त करण्यासाठी ते कोणतेही पापकृत्य करण्यास धजावत नाहीत.
धन आणि जीवनाचा स्तर
श्रील प्रभुपाद सांगतात की शास्त्रांनुसार ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्याशांना भीक्षा स्वीकार करण्याची अनुमती आहे आणि त्यांना समाजाची संतान समजले जाते. अशा समाजात अधिकांश गृहस्थ असत. दुसर्या शब्दांत, आपली वैदिक सभ्यता सर्वाधिक पूर्ण सामाजिक व्यवस्था आहे. केवळ गृहस्थांना धन कमविण्याची अनुमती आहे, विशेषत: क्षत्रिय आणि वैश्यांना, आणि हे धन संपूर्ण समाजात वितरित केले जायचे.” (पत्र, 11 फेब्रुवारी – 1970)
दुसर्या शब्दांत, गृहस्थ लोक नागरीकांवर शासनाद्वारे अथवा प्रामाणिक व्यापाराद्वारे धन कमवितात आणि त्याचा खर्च आपल्या कुटूंबासाठी तसेच कृष्णभावनेच्या प्रचारासाठी करतात. अनेक गृहस्थ भक्तांना लिहिलेल्या पत्रात श्रील प्रभुपाद लिहितात, “श्रीकृष्ण आपणास बुद्धी प्रदान करतील की कशा प्रकारे त्यांच्या प्रतिनिधीच्या रूपात आपण प्रामाणिकपणे महान कार्य करू शकतो. अप्रामाणिकतेची गरज नाही. श्रीकृष्णांनी पुरेसे धन दिले आहे, आता ते केवळ प्रामाणिकपणे कमवायचे आहे.” (पत्र, 24 जानेवारी – 1977)
गृहस्थाने इतरांचे दास बनून धन कमवित अनावश्यक भौतिक सुविधांच्या मागे लागू नये. आणि, अधिक धन प्राप्त झाले तर त्याचा उपयोग कृष्णभावनेच्या प्रचारार्थ करावा. गृहस्थांनी आपले धन अत्यंत सावधपणे ठेवले पाहिजे आणि योग्यवेळी चांगल्या कार्यांसाठी अथवा गरजेसाठी त्याचा वापर करावा. असे करण्यात काही दोष नाही.
श्रील प्रभुपादांनी सांगितले की कशा प्रकारे भारतीय गावातील लोक शहरात येऊन धन कमवित आणि ते गावातील घरी कुटूंबाच्या खर्चासाठी पाठवित. त्यांच्या बुद्धिमान पत्नी या धनाची बचत करून त्याद्वारे जमीन खरेदी करीत. जेव्हा त्यांच्याकडे पुरेशी जमीन यायची तेव्हा पती गावात पुन्हा येत असे आणि त्या जमिनीतून गरजेच्या वस्तू प्राप्त करू आत्मनिर्भर बनत. “ही फार चांगली गोष्ट आहे,” श्रील प्रभुपादांनी सांगितले. “आपल्या कुटुंबियांसमवेत गावात राहा.” (वार्ताला, 4 जानेवारी 1977) आणि, त्यांनी हे देखील सांगितले, “सिद्धान्त असा की पती प्रामाणिकपणे उपजीविका कमविण्याचा प्रयत्न करायचा आणि घरात पत्नी या पैशांतून घर चालवून काही पैशांची बचत करीत असे. ती विनाकारण पतीकडे पैशांची मागणी करीत नसे. अशा वातावरणात सर्वजण सुखी रहात.” (वार्तालाप, 14 जून, 1976)
मुख्य गोष्ट अशी की प्रत्येक व्यक्ती केवळ चांगल्या कार्यांसाठी धन खर्च करण्यास शिकले पाहिजे.
धन आणि श्रीकृष्णांची सेवा
गृहस्थ भक्तांनी धन कमविलेच पाहिजे, कारण धनाशिवाय या भौतिक जगात राहणे शक्य नाही. श्री चैतन्य चरितामृत (मध्यलीला 16.238) श्री चैतन्य महाप्रभू रघुनाथदास गोस्वामींना सांगतात, “लोकांना दाखविण्यासाठी मरकट वैरागी बनू नको. आता जितके आवश्यक आहे त्यानुसार भौतिक जगात भोग कर आणि त्याप्रति आसक्त होऊ नकोस.” दुसर्या शब्दांत, गृहस्थांनी धनार्जन करताना निरंतर श्रीकृष्णांचे चिंतन केले पाहिजे आणि स्वत:ला समाजाचा नम्र सेवक समजले पाहिजे. भगवंतांना प्रत्येक वस्तूचे स्वामी आणि नियंत्रक असल्याचे समजणारे भक्त अधिक धनसंचय करण्याच्या विचाराने विचलित होत नाही. त्यांच्याकडे जे काही आहे ते त्याचा उपयोग भगवंतांच्या सेवेत करतात. श्रील प्रभुपाद लिहितात, “जर कोणी प्रामाणिकपणे कमविलेल्या धनाचा उपयोग भगवंतांच्या सेवेत करतो तेव्हा तीच भगवंत, गुरू आणि वैष्णवांप्रति त्याची सेवा आहे.” (श्री चैतन्य चरितामृत, अंत्यलीला 6.275 – तात्पर्य)
भक्त संतुष्ट जीवन जगतात – “कारण, एक भक्त भगवंतांच्या इच्छांची पूर्तता करू इच्छितो. जर भगवंतांची इच्छा असेल तर तो सर्व प्रकारची ऐश्वर्यांचा भगवंतांच्या सेवेखातर स्वीकार करतो आणि भगवंतांची इच्छा नसेल तर त्याने एक पैसादेखील स्वीकारला नाही पाहिजे.” (भगवद्घीता 1.32-34 – तात्पर्य) “आपण जीवनातील गरजांविषयी चिंतीत का असावे? सिद्धान्त हा असला पाहिजे की आपण नितांत गरजेपेक्षा अधिक प्राप्त करण्याची इच्छा केली नाही पाहिजे. भक्तांनी याबाबत अत्यधिक सर्तक राहिले पाहिजे की त्यांनी केवळ अशा वस्तूंचाच स्वीकार करावा ज्याची त्यांना नितांत गरज आहे आणि त्यांनी अनावश्यक वस्तूंची जमवाजमव करू नये.” (श्री चैतन्य चरितामृत, मध्यलीला 24.262 – तात्पर्य)
याबरोबर भक्तांनी आपल्या कर्तव्यांविषयी संतुलन ठेवले पाहिजे जेणेकरून ते आणि त्याचे कुटुंबिय सुरक्षिततेचा अनुभव करू शकतील – “श्रील रूप गोस्वामींनी आपल्या उदाहरणाद्वारे शिकविले आहे आपण पन्नास टक्के धन श्रीकृष्णांसाठी, पंचवीस टक्के धन स्वत:साठी आणि उर्वरित पंचवीस टक्के धन आपल्या कुटूंबातील सदस्यांसाठी राखून ठेवावे.” (श्रीमद्भागवत 8.19.37 – तात्पर्य)
एखाद्याकडे अधिक धन असो वा कमी, अंतत: त्याच्याकडून ते निघून जाणारच आहे, एक तर खर्च करून किंवा मृत्यूवेळी. जसे श्रील प्रभुपादांनी सांगितले –
आपणास शरीर बदलावे लागेल. आपण कोट्यवधी रुपये कमविले आहेत. ते ठीक आहे. परंतु, तुम्हाला मृत्यूनंतर काहीच घेऊन जाता येणार नाही. तुम्ही तुमचे धन स्मशानभूमीत घेऊन जाऊ शकत नाही. ते शक्य नाही. अशावेळी तुमच्यासाठी त्या धनाचे मूल्य शून्य आहे. तुम्ही येताना काही घेऊन आला नाहीत आणि जातानाही तुम्हाला काहीच घेऊन जाता येणार नाही. म्हणून आपण जे काही कमवितो ते शून्यच आहे. परंतु, या सर्व शून्यांबरोबर श्रीकृष्णांची सेवा करण्याचा पयत्न करता तेव्हा तुम्हाला वास्तवात काहीतरी मूल्य प्राप्त होईल. (वार्तालाप, 31 जुलै – 1975)
धनाचा व्यर्थ खर्च
“तुमच्याकडील जे काही धन आहे ते श्रीकृष्णांचे आहे,” श्रील प्रभुपाद लिहितात, “म्हणून थोडेदेखील धन व्यर्थ गोष्टींमागे खर्च करू नका.” (पत्र, 24 ऑक्टोबर – 1974) धन कमविणे अवघड नाही कारण श्रीकृष्ण आपल्या प्रामाणिक भक्तांना धन प्रदान करतात. ते व्यर्थ गोष्टींमागे खर्च न करणे कठीण आहे, कारण त्यासाठी बुद्धिमत्ता हवी. श्रीकृष्ण धन देतात आणि व्यर्थ गोष्टींमागे ते खर्च करणे उन्नत भक्तांसाठी देखील समस्या होऊ शकते. उदाहरणार्थ, एकदा श्री चैतन्य महाप्रभूंनी सम्मानपूर्वक शिवानंद सेन यांना सांगितले, “वासुदेव दत्तांची चांगली काळजी घ्या. वासुदेव दत्त अत्यंत उदार आहेत. दररोज ते जे काही कमवितात, त्याला ते खर्च करून टाकतात. ते स्वत:साठी काहीच धन शिल्लक ठेवत नाहीत. एक गृहस्थ असल्याकारणे वासुदेव दत्तांनी धनाची बचत केली पाहिजे. ते असे करीत नसल्याने त्यांच्यासाठी कुटूंब चालविणे त्यांच्यासाठी अवघड आहे. कृपया वासुदेव दत्तांच्या कौटुंबिक गोष्टींमध्ये ध्यान द्या. त्यांचे व्यवस्थापक बना आणि त्यांची योग्य व्यवस्था करून ठेवा.” (श्री चैतन्य चरितामृत, मध्यलीला 15.93-96) वासुदेव दत्तांप्रमाणे जे भक्त धन खर्च करण्याबाबत कुशल नाही आहेत त्यांनी स्वत:ला विश्वसनीय आणि बुद्धिमान भक्तांच्या देखरेखीखाली स्वत:ला ठेवले पाहिजे.
लक्ष्मीदेवीच कृपा
“प्रत्येक व्यक्तीला लक्ष्मीदेवीची कृपा हवी आहे,” श्रील प्रभुपाद लिहितात, “परंतु, लोकांना हे माहीत नाही की भगवान श्रीकृष्ण समस्त लक्ष्मीदेवींचे पती आहेत.” (श्रीमद्भागवत 2.4.20 – तात्पर्य) जेव्हा आपण लक्ष्मीला भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत नियुक्त करतो तेव्हा हळूहळू जीवनातील प्रत्येक पावलावर आपण भगवंतांचा अनुभव करू लागतो. कृष्णभावनेच्या या संस्कृतीच्या आधारावर आपले सुख हे आपल्या धनसंपत्तीवर निर्भर राहणार नाही. आपण धन नसताना देखील संतुष्ट राहू. “जर कोणतीही संस्कृती नसेल,” श्रील प्रभुपादांनी सांगितले, “केवळ धनाच्या आधारावर आपण सभ्यता टिकवून ठेवू शकत नाही. ते शक्य नाही. आत्ताचे अमेरिकेतील नेता विचार करीत आहे, ‘आपल्याकडे इतके धन असेल तर सर्व काही ठीक होईल.’ खरेतर, धनाद्वारे तुम्ही सामाजिक संस्कृतीचे सर्व दोष झाकून टाकण्याचा प्रयत्न करीत आहात. परंतु, हे किती दिवस चालेल! म्हणून समाजात संस्कृतीची आवश्यकता आहे.” (वार्तालाप, 15 जून – 1976)
संस्कृती असलेल्या व्यक्तीकडे श्रीकृष्णांप्रति श्रद्धा असल्याने त्याच्याकडे सर्व काही आहे. श्रील प्रभुपाद लिहितात, “भगवंतांच्या शब्दांमध्ये पूर्ण श्रद्धा असणार्या शुद्ध भक्ताला सर्वात महान विद्वान, सर्वात मोठा शासक आणि विश्वातील सर्वात धनी व्यक्ती मानले पाहिजे.” (श्री चैतन्य चरितामृत, मध्यलीला 2.5.76 – तात्पर्य)
विशाखा देवी दासी श्रील प्रभुपादांच्या वरिष्ठ शिष्या आहेत. त्या आपले पती, यदुवर दास यांच्यासमवेत कॅनडातील हरे कृष्ण कृषिक्षेत्र, शरणागती येथे निवास करतात.