खालील वार्तालाप कृष्णकृपाश्रीमूर्ती श्रील ए. सी. भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद तसेच भक्त शास्त्रज्ञ डॉ. सिंग यांच्यामध्ये 3 फेब्रुवारी, 1977 रोजी भुवनेश्वर येथे पार पडला.
श्रील प्रभुपाद : ही गोष्ट समजण्याचा प्रयत्न करा. जर व्यक्ती भगवद्भक्त नसेल तर त्याचे संपूर्ण जीवन अंध:कारमय आहे. अशा जीवनाचे काहीच मूल्य नाही. त्याचे जीवन निंदनीय आहे. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात – दुष्कृतिन:, मूढ:, नराधमा:, माययापहृतज्ञान: – अर्थात, “मूर्ख, गाढव, मनुष्यांमध्ये अधम तसेच ज्याचे ज्ञान मायेद्वारे अपहरण केले गेले आहे.”
अशा लोकांबाबत काय केले जाऊ शकते? जो वैज्ञानिक वास्तविक ज्ञान अर्थात भगवद्विज्ञान समजण्याचा प्रयत्न करीत नाही, तो निंदनीय आहे.
“अरे? परंतु, त्यांच्याकडे मोठमोठ्या पदवी आहेत”. नाही, माययापहृतज्ञान:. भगवद्विज्ञानाविना त्यांच्याकडील ज्ञान हे भ्रामक आहे. ज्या व्यक्तीकडे कृष्णभक्तीचे ज्ञान नाही, त्याची फार निंदा केली आहे. तुम्ही त्याला कोणतेही पद देऊ शकत नाही. जेव्हा एखादा व्यक्ती वेडा होतो तेव्हा त्याची स्थिती काय असते?
भलेही तो उच्च न्यायालयातील न्यायाधीश असला तरी तो जर वेडा झाला तर त्याला पदावर ठेवले जात नाही. त्याचे काहीच मूल्य रहात नाही.
आपण म्हणाल, “पण, तो तर मोठा न्यायाधीश आहे!”
ते बरोबर आहे, परंतु सध्या तो वेडा झाला असल्याने त्याचे या पदाचे कोणतेच मूल्य नाही. मी हे प्रत्यक्ष पाहिले आहे. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी माझ्या सासर्यांच्या घराजवळ एक वैज्ञानिक रहात होता. तो फार मोठा विद्वान होता. पी.एच.डी. सारख्या त्याच्याकडे अनेक पदव्या होता. परंतु, काही काळानंतर तो वेडा झाला आणि माझ्या सासर्यांच्या घरासमोरील रस्त्यावरून तो निर्वस्त्र होऊन पळत असे.
तेव्हा अशा वैज्ञानिकाचे काय मूल्य? विचार करा. ज्ञानाच्या विविध क्षेत्रांविषयी त्याला माहिती होती, पण आता तो वेडा होऊन चोहीकडे निर्वस्त्र अवस्थेत पळत आहे. मग, अशा व्यक्तीचा कोण बरे सम्मान करेल?
तर, जो कोणता मनुष्य भौतिक शक्तीच्या या भ्रामक प्रभावाखाली आहे, तो अशा वेड्या मनुष्याप्रमाणे आहे. खरेतर, तो देखील भगवंतांचा अंश आहे; मात्र सध्या तो भगवंतांना विसरला आहे. म्हणून त्याला वेडा म्हटले आहे.
पिशाची पैले येन मति छन्न हय।
मायाग्रस्त जीवेर हय सेइ भाव उदय॥
व्यक्ती वेडा होतो तेव्हा त्याचे जीवन समाप्त होते. तो जे काही बोलतो, ते वेडेपणच असते. त्याच्या वचनाला कोणतेच मूल्य रहात नाही. भलेही सापेक्ष स्तरावर त्याचे शब्द महत्वपूर्ण वाटले तरी पूर्ण स्तरावर त्याला वेडेपणाच मानले जाईल. तो व्यक्ती काहीही असला तरी आता तो वेडा झाला आहे.
डॉ सिंह : वैज्ञानिकांचे वेडेपण थोडे निराळे आहे. त्यांना भगवंतांच्या नियमांविषयी अगदी थोडी माहिती आहे; परंतु तरी ते मोठमोठ्या गोष्टी करतात.
श्रील प्रभुपाद : तुम्ही अनेक प्रकारे त्यांच्या वेडेपणाला समजू शकतो. सर्वात आधी ही गोष्ट जाणून घ्या जेव्हा एखादा अत्यंत सुशिक्षित व्यक्ती वेडा होतो तेव्हा त्याच्या शब्दांना कोणतेच मूल्य रहात नाही. जर उच्च न्यायालयातील न्यायाधीश वेडा झाल्यास आपण त्याला त्याच्या पदावर ठेवणार नाही. आपण असे म्हणणार नाही, “महोदय, आपण वेडे झाला आहात, पण तरी काय फरक पडत नाही. आपण आधीप्रमाणेच न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसून निर्णय द्या.” नाही, हे शक्य नाही.
हो, उपचाराद्वारा व्यक्तीला आधीप्रमाणे ठीक केले जाऊ शकते. तेव्हा तो पुन्हा आपल्या पदावर कार्य करू शकतो. परंतु, जोपर्यंत तो वेडा असेल तोपर्यंत त्याच्या पदाचे, शिक्षणाचे, शब्दांचे कोणतेच मूल्य रहात नाही.
डॉ. सिंह : माझे देखील असेच मत आहे. एखादा वैज्ञानिक चुकीच्या निष्कर्षाप्रत पोहोचत असेल तर त्याच्या वचनांचा स्वीकार केला जाणार नाही. दुसर्या शब्दांत, अशा व्यक्तीला बुद्धिमान मानले जाईल जो जाणतो की त्याचे ज्ञान अत्यंत सीमित आहे. आणि, जर आपल्या सीमित बुद्धीद्वारे आपल्या ज्ञानापलीकडील विषयांना समजणे अथवा समजाविण्याचा प्रयत्न केल्यास ते निष्कर्ष नेहमीच चुकीचे ठरतील.
श्रील प्रभुपाद : हो. जर आपल्या सीमित बुद्धीद्वारा असीमित वस्तूला समजण्याचा प्रयत्न करू, तेव्हा आपले निष्कर्ष चुकीचे ठरतील. आपले निष्कर्ष तोपर्यंत चुकीचे ठरतील जोपर्यंत आपण आपल्याहून श्रेष्ठ व्यक्तीकडून ज्ञान स्वीकारणार नाही. दुसर्या शब्दांत, आपणास प्रामाणिक स्रोतांकडून ज्ञान स्वीकारले पाहिजे.
मी पुन्हा तेच उदाहरण सांगतो. एका छोट्या मुलाला त्याचे वडील कोण आहेत, हे जाणायचे असेल तर ते त्याच्या बुद्धी अथवा ज्ञानशक्तीच्या पलीकडे आहे. परंतु, जर तो आपल्या मातेकडून ज्ञान प्राप्त करतो, तर त्वरित त्याला उत्तर मिळते – “ही व्यक्ती तुझे पिता आहेत,” तेव्हा त्याचे ज्ञान परिपूर्ण मानले जाईल.
आरोहपंथ आणि अवरोहपंथ. ज्ञान प्राप्त करण्याचे दोन मार्ग आहेत – आरोह आणि अवरोह. एकीकडे आरोह मार्ग, जेथे आपल्या अनुभव आणि प्रयत्नांद्वारा अज्ञानाच्या वर उठण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरा मार्ग आहे अवरोह मार्ग, जेथे आपण अशा व्यक्तीकडून ज्ञान ग्रहण करता ज्याने या ज्ञानाचा साक्षात्कार केलेला आहे.
सध्या आपण भौतिक शरीराद्वारे बद्ध आहोत. आपल्या इंद्रिये मर्यादित आहेत आणि अनेकानेक गोष्टी आपल्या आकलनशक्तीच्या पलीकडे आहेत. म्हणून आपण अवरोह मार्गाचा आश्रय घेतला पाहिजे. ही आमची पद्धत आहे. आपण वेदांचा आश्रय घेतला पाहिजे. त्यांना श्रुती म्हटले जाते, अर्थात – असे ज्ञान जे ज्ञानी व्यक्तीकडून श्रवणाद्वारे प्राप्त केले जाते. जसे, सुरुवातीला भगवान श्रीकृष्णांनी हे ज्ञान ब्रह्मदेवांना दिले, ब्रह्मदेवांनी ते नारदमुनींना दिले, नारदांनी व्यासांना… अशा प्रकारे हे ज्ञान परिपूर्ण आहे.
आपल्या सीमित बुद्धीद्वारे आरोह मार्गावर चालत जे काही ज्ञान प्राप्त कराल, ते नेहमी अपूर्णच असेल. परंतु, भगवंतांपासून मिळत असलेले आणि अवरोह मार्गाद्वारे प्राप्त ज्ञान परिपूर्ण आहे. इतर सर्व मार्ग अपूर्ण आहेत.
श्रील प्रभुपाद : हो, तो परिपूर्ण ज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग आहे.