काळशक्ती
काळाविषयी मला सदैव कुतूहल वाटते. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण तीन ठिकाणी आपल्या या काळशक्तीचे वर्णन करतात.
श्लोक क्रमांक 10.30 मध्ये ते सांगतात, कलौ कलयतां अहम् – “या भौतिक जगात अनेक विनाशकारी तत्त्वे आहे; पण त्यापैकी सर्वात विनाशकारी तत्त्व म्हणजे काळ, आणि तो काळ मी आहे.” भौतिक जगामध्ये अनेक वस्तूंची निर्मिती आणि विनाश होतो. एखाद्या वस्तूचे कितीही जतन केले तरी शेवटी काळ त्याचा सर्वनाश करतोच. छोट्या-मोठ्या वस्तूंची गोष्ट सोडा, काळाच्या प्रभावाने संपूर्ण भौतिक सृष्टीचा देखील विनाश होईल (प्रलय).
मनात प्रश्न उठतो, या भौतिक जगातील सर्व काही नष्ट होणार असेल तर काळ देखील एक दिवस नष्ट होईल का? याच्या उत्तरार्थ श्रीकृष्ण गीतेत (10.33) सांगतात, अहं एव अक्षय: काल: – “माझ्याप्रमाणे काळ देखील अक्षय आहे. काळाला नष्ट करण्याचे सामर्थ्य कोणाकडेही नाही.”
आणि, शेवटी श्रीकृष्ण सांगतात, “हे अर्जुन, वास्तवत: हा काळ मीच आहे आणि या रूपात मी या युद्धभूमीवर तुम्हा पांडवांना सोडून इतर सर्वांचा विनाश करण्यासाठी आलो आहे. (भ.गी. 11.32)
स्वत: श्रीकृष्ण काळशक्ती असल्याचे पाहून आपणास समाधान वाटले पाहिजे. आपणा सर्वांना जीवनात विभिन्न वस्तू आणि लोकांचा विनाश पहावा लागतो. परंतु, हा विनाशी काळ भगवान श्रीकृष्णांची शक्ती आहे. ज्याप्रमाणे श्रीकृष्णांची एखादी शक्ती आपणास आनंद देते, दुसरी आपले मार्गदर्शन करते, तिसरी आपली मदत करते, त्याचप्रमाणे श्रीकृष्णांची ही काळशक्ती आपले परमकल्याणच करते. मात्र, अपरिपक्व अवस्थेत आपण हे जाणू शकत नाही. यास्तव जीवनात काळाचा प्रभाव पाहून आपण भयभीत किंवा विचलित होऊ नये. काळाच्या रूपात भगवंत भक्त तसेच अभक्त या दोघांशी व्यवहार करतात. मांजरीचा जबडा पिल्लासाठी सुरक्षित ठिकाण असते, तर तोच जबडा एका उंडसाठी साक्षात मृत्यू असतो. त्याचप्रमाणे काळाचा प्रभाव भगवद्भक्तांना भगवंतांजवळ आणतो आणि तोच काळ अभक्तांना निरंतर जन्म-मृत्यूच्या चक्रात ढकलून देतो.
घड्याळाच्या काट्यांना थांबविता येईल, मात्र काळाच्या पावलांना कोणीच थांबवू शकत नाही. या जगात सूर्योदय आणि येणारे ऋतूंना थांबविण्याचे सामर्थ कोणाकडे आहे? आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, निरंतर समान गतीने चालणारा काळ एखाद्याची गती थांबवितो, एखाद्याची गती मंदावतो, तर एखाद्याची गती तीव्र करतो.
नेहमी आपल्या कानावर पडते, “अरे! कालपर्यंत सर्व काही ठीक होते, आज अचानक हे घडले.” काळाच्या घट्ट नियंत्रणात असून देखील मोहग्रस्त झालेले जीवन स्वत:ला स्वतंत्र आणि नियंत्रक मानतात.
एकदा एक भिक्षुकाने युधिष्ठिर महाराजांच्या सभेत येऊन मदतीची याचना केली. कामात व्यस्त असल्याने राजाने त्याला दुसर्या दिवशी येण्यास सांगितले.
भिक्षुक परतला, मात्र युधिष्ठिरांची गोष्ट ऐकून भीम नगारा वाजवित नगराच्या दिशेने जाऊ लागला. हे पाहून आश्चर्यचकीत झालेल्या युधिष्ठिरांनी भीमाला यामागील कारण विचारले.
भीम म्हणाला, “भ्राता! आज तुम्ही काळाविरुद्ध युद्ध जिंकले आहे आणि मी त्याची घोषणा करण्यासाठी नगरात जात आहे.”
युधिष्ठिरांनी विचारले, “भीमा, तुझ्या बोलण्याचा अर्थ काय?
भीम म्हणाला, “तुम्ही आत्ताच भिक्षुकाला उद्या येण्यासाठी सांगितले. उद्यापर्यंत तो जीवंत राहील, हे तुम्ही कसे काय जाणले? उद्यापर्यंत तुम्ही देखील जीवंत रहाल, याची देखील शाश्वती आहे का?
“किंवा, तुम्ही दोघेही जीवंत असाल, तरी उद्या तुमच्याकडे दान देण्याची स्थिती असेल का? उद्या देखील त्याला या वस्तूची आवश्यकता असेल, हे तुम्ही जाणता का? उद्या तुम्हा दोघांची पुन्हा भेट होईल, याबाबत तुम्ही इतके विश्वस्त कसे काय आहात?
“म्हणून मला सर्वांना सांगायचे आहे की इतिहासातील तुम्ही असे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी काळावर विजय प्राप्त केला आहे.” युधिष्ठिरांनी भीमाचा आशय जाणला आणि त्वरित भिक्षुकाला परत बोलवून त्याची मदत केली.
काळाच्या अदम्य प्रचंड शक्तीचे ज्ञान असलेले बुद्धिमान लोक अशा कार्यांपासून दूर राहतात ते त्यांना काळासमोर आंतर्बाह्य दुर्बळ बनवितात. ते सदैव अशा कार्यांमध्ये व्यस्त राहण्याचा प्रयत्न करतात जे आत्म्याच्या स्वभावाला अनुकूल आहेत आणि त्यांना काळाचे स्वामी असणार्या भगवान श्रीकृष्णांच्या जवळ घेऊन जातील.
– वंशी विहारी दास