नॉट आऊट! पण, कधीपर्यंत?
नुकतेच सोशल मीडियावर आपल्या दोन्ही हात उंचावलेल्या प्रसन्नमुद्रेतील एका भारतीय राजनेत्याचे चित्र प्रसारित झाले. ते त्यांच्या 84व्या वाढदिवसाचे चित्र होते आणि त्यावर शिर्षक होते ‘नॉट आऊट – 84’.
नॉट आऊट! पण, कधीपर्यंत? दीर्घायुष्य प्राप्त होणे, हीच गर्वाची गोष्ट आहे का? वृक्ष हजारो वर्षे जगत नाहीत का?
खरेतर, आपण किती काळ जगतो हे महत्वपूर्ण नाही, तर आपण कशा प्रकारे जगतो हे महत्वपूर्ण आहे. मृत्यू अपरिहार्य आहे. “जन्म घेणार्यासाठी मृत्यू आणि मृत झालेल्यासाठी जन्म अटळ आहे.” (भगवद्गीता 2.27) म्हणून या जगाला मृत्युलोक म्हटले आहे. येथे उदयास येणारी प्रत्येक गोष्ट मृत्यूच्या दिशेनेच मार्गक्रमण करते. अगदी सूर्यासारखे महाकाय ग्रह आणि हिमालयासारखे प्रचंड पर्वतदेखील काळाच्या ओघात नष्ट होतील, मग आपल्यासारख्या तुच्छ मनुष्यांबाबत काय सांगावे!
प्रत्येक प्राण्याचा जीवनकाळ निराळा आहे. काही प्राण्यांसाठी तो एक दिवसाचा असतो आणि मनुष्यांसाठी 100 वर्षांपर्यंतचा असतो. एका कल्पात मनुष्यांच्या हजारो पिढ्या निघून जातात आणि एका इंद्राचे जीवन 71 कल्पांचे असते. ब्रह्मदेवांच्या एका दिवसात असे 14 आणि पूर्ण शंभर वर्षांच्या जीवनकाळात 5 लाख 4 हजार इंद्र येतात-जातात. परंतु, शाश्वत काळामध्ये इतका विशाल जीवनकाळ असलेल्या ब्रह्मदेवांचे जीवन हे महाविष्णूंच्या एका श्वासाइतके असते. परंतु, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, प्रत्येक जीवाला वाटते की त्याचेे जीवन फार मोठे आहे.
मृत्यू अटळ असल्याचे सर्वजण जाणतात, पण तरीही आपल्यापैकी कोणालाही मृत्यू का नको आहे? कारण, आत्मा अमर असल्याने तो मर्त्य शरीरात बद्ध झाल्यावर तो या शरीराकडून देखील अमरत्वाची अपेक्षा करतो. युधिष्ठिर महाराजांना जगातील सर्वात आश्चर्यकारक गोष्टीविषयी विचारले असता ते म्हणाले, “प्रत्येक व्यक्ती चोहीकडे दररोज लोकांना मृत होत असल्याचे पाहतो, मात्र तो स्वत:च्या मृत्यूचा कधीच विचार करीत नाही. हीच जगातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे.”
1944 साली ‘बॅक टू गॉडहेड’ मासिकाच्या आरंभिक अंकामध्ये श्रील प्रभुपादांनी या विषयाबाबत एक लेख लिहिला होता. लेख श्रीमान् बनार्ड शॉ यांच्या एका कथनावर आधारित होता ज्यात राष्ट्रपिता, महात्मा गांधीच्या जन्मदिवशी शुभेच्छा देताना ते म्हणाले होते, “हा आपला 76 वा नव्हे तर 35वा वाढदिवस असता तर किती चांगले झाले असते!”
श्रील प्रभुपाद लिहितात, “महात्मा गांधीच्या वर्तमान वयोमानातून 41 वर्षे कमी करण्याच्या प्रयत्नात आम्ही देखील श्रीमान शॉ यांच्याशी सहमत आहोत. सर्वांना चिरायू बनायचे आहे; परंतु क्रूर मृत्यू आपल्या इच्छांचा मूळीच सम्मान करीत नाही.”
पुराणांमध्ये एक कथा येते. व्यासदेवांचे आजोबा, वासू यांना मृत्यूचे फार भय वाटत होते. अमर होण्याची इच्छा मनी बाळगून ते एके दिवशी व्यासदेवांकडे पोहोचले. व्यासदेवांनी त्यांना क्रमश: ब्रह्मदेव, भगवान शंकर आणि भगवान विष्णूंकडे घेऊन गेले. वासूची ही इच्छा पूर्ण होऊ शकेल का, हे जाणण्यासाठी ते पाचही जण यमलोकात पोहोचले. संपूर्ण कथन ऐकल्यावर यमराज सर्वांबरोबर आपले सचिव, चित्रगुप्ताकडे जाऊ लागले. परंतु, तेव्हाच पायर्यांवरून उतरताना अचानक वासू यांचा पाय घसरला आणि ते मृत्युमूखी पडले. तत्क्षण चित्रगुप्त तेथे आले. त्यांनी सांगितले, “सकाळपासून वासूंच्या जीवकाळाबाबत ते चिंतीत होते, कारण त्यांच्या वहीत लिहिले होते की आज वासू स्वत: व्यासदेव, ब्रह्मदेव, शंकर आणि भगवान विष्णूंबरोबर यमपुरीत येतील आणि येथेच त्यांचा मृत्यू होईल.”
काळाला कोण बरे पराजित करू शकतो! एकेकाळी संपूर्ण जगावर सत्ता गाजविणारे रोमन साम्राज्य, बिटिश साम्राज्य, मोघल साम्राज्य आज कुठे आहे? कुठे आहे अॅलेक्झांडर, औरंबजेब, हिटलर वा नेपोलियन? या साधारण मनुष्य आणि साम्राज्यांविषयी काय सांगावे, अगदी या पृथ्वीवरील स्वत: भगवंतांची नगरी – अयोध्या, द्वारका देखील काळाद्वारे प्रभावित झाल्याची प्रतीत होते. खरेतर, भगवंत आणि त्यांचे नित्य धाम हे भौतिक जगाच्या नियमांपलिकडे असले तरी या नियमांची अचूकता दर्शविण्यासाठी अनेकदा ते स्वत: काळाच्या अधीन असल्याचे दाखवितात. अशा प्रकारे अनादीकाळापासून अंत काळापर्यंत काळ हाच या जगातील निविर्वाद सम्राट आहे आणि शेवटपर्यंत राहील.
परंतु, हाच काळ भगवंतांच्या अधीन आहे. (भगवद्गीता 11.32) काळ ही भगवंतांची शक्ती असल्याचे जाणून भक्त काळाशी युद्ध न करता भगवंतांचा आश्रय घेतो. तो जाणतो की श्रीकृष्णांची इच्छा असेल तर काळ त्याचे काहीच बिघडवू शकणार नाही. याबरोबर त्याला पूर्ण विश्वास असतो की काळ अधिकतर त्याच्या भौतिक शरीर वा परिस्थितीला प्रभावित करू शकतो, त्याच्या भक्तीला नष्ट करू शकत नाही. तो मृत्यूपासून स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करीत नाही, तर त्याकडे अनुकूल दृष्टीकोण ठेवून त्याचे स्वागत करतो. स्वत:ला शरीरस्तराच्या पलीकडे स्थित करून तो सहजपणे मृत्यूनंतर भगवद्धामात प्रवेश करतो.
आणि, जसे श्रीकृष्ण भगवद्गीतेत (8.16) सांगतात, “प्राकृत जगतातल्या अत्युच्च ब्रह्मलोकापासून ते सर्वात खालच्या लोकापर्यंत सर्व लोक दु:खाची स्थाने आहेत. या लोकात वारंवार जन्म-मृत्यू होतात; परंतु हे कौंतेया! माझे धाम प्राप्त करणार्या जीवास कधीच पुनर्जन्म नसतो.” … म्हणून खरेतर केवळ एक भक्तच ‘नॉट आऊट’ राहतो.
– वंशीबिहारी दास