सफलतेची दौड
या अंकात श्रीमान महात्मा दास वास्तविक सफलतेचे सुंदर विश्लेषण करीत सफलतेच्या सांसारिक धारणेला आव्हान देतात. सांसारिक धारणा सफलतेला एक लक्ष्य मानते, अर्थात लक्ष्यप्राप्तीलाच सफलता मानले जाते. आणि, व्यक्ती हे लक्ष्य प्राप्त करण्यात कमी पडला तर त्याला असफल मानले जाते.
दुसरीकडे, आध्यात्मिक धारणा सफलतेला एक कृती मानते, अर्थात लक्ष्य प्राप्त करण्याचा प्रयत्नच खरी सफलता आहे. व्यक्तीने मनापासून आपल्या लक्ष्यप्राप्तीसाठी प्रयत्न केला, मात्र त्याला त्यात यश प्राप्त झाले नाही तरी त्याला पूर्णपणे सफल मानले जाईल. रामायणातील एका उदाहरणावरून ही गोष्ट समजून घेऊ.
जेव्हा रावण सीतामातेचे अपहरण करून हवाईमार्गाने तिला घेऊन जात होता, त्यावेळी गिद्धराज जटायूने त्याला पाहिले. जटायू वृद्ध होता आणि त्याची बरोबरी बलशाली रावणाशी शक्य नव्हती. तरीही, तो आपल्या डोळ्यांसमक्ष एक राक्षस सीतामातेला अपहरण करून नेत असल्याचे कसे काय पाहू शकत होता? त्याला आपल्या प्राणांचे भय नव्हते. त्याला भय होते की रावणाला थांबविण्याचा प्रयत्न न केल्यास तो कसे काय श्री रामांसमोर उभा राहू शकेल. जेव्हा श्री रामांनी त्याला विचारले असते – “जटायू! माझ्या प्रिय सीतेला घेऊन तो राक्षस जात असताना तू त्याला थांबविण्याचा प्रयत्न का केला नाहीस?” जटायूला भय होते की तो यावेळी श्री रामांना काय उत्तर देणार होता. त्याने मागचा-पुढचा विचार न करता रावणावर आक्रमण केले. तो जाणत होता की युद्धात त्याला आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागणार होता. अंतत: रावणाने त्याचे दोन्ही पंख छाटून टाकल्यावर तो जमिनीवर कोसळला.
भौतिकदृष्टी तो या कार्यात असफल ठरला. रावण त्याला मरणासन्न अवस्थेत सोडून सीतेला लंकेत घेऊन गेला. परंतु, भगवान श्री रामांच्या दृष्टीकोणातून जटायू शंकर टक्के यशस्वी ठरला. त्यांनी स्वहस्ते जटायूचा अंतिम संस्कार केला. जे सौभाग्य श्री रामांचे पिता, दशरथ यांना प्राप्त झाले नाही, ते पक्षी योनीत जन्मलेला जटायूला प्राप्त झाले.
श्री रामांसाठी रावणाचा वध करणे फार मोठे कार्य नव्हते. जे भगवंत आपल्या एका श्वासात असंख्य ब्रह्मांडांची उत्पत्ती आणि संहार करू शकतात, त्यांच्यासाठी एका तुच्छ राक्षसाचा वध करणे कशा प्रकारे कठीण असू शकते!
जे भगवंत आपल्या केवळ इच्छेने असंख्य ब्रह्मांडांना अंतरिक्षात तरंग ठेवू शकतात, त्यांना एका छोट्या समुद्रावर तरंगणारा सेतू बांधण्यासाठी वानरांची आवश्यकता कशी पडू शकेल? जे भगवंत आपल्या श्रीकृष्णांच्या रूपात इंद्रलोकातून पारिजात वृक्ष घेऊन आले, त्यांना लक्ष्मणाच्या रक्षणार्थ संजीवनी आणण्यासाठी हनुमंतांची गरज पडू शकेल का? जे भगवंत परमात्मा रूपात कणाकणात व्याप्त आहेत, त्यांना सीतेचा शोध घेण्याकरिता सुग्रीवाची गरज लागली असती का? खरेतर, भगवंत आपल्या मधुर लीलांद्वारा आपणास त्यांच्याजवळ येण्याची संधी प्रदान करतात. मग, तो जटायू असो, सुग्रीव, हनुमान, इतर वानर – या सर्वांनी श्री रामांनी दिलेल्या संधीचा लाभ घेत आपले जीवन यशस्वी बनविले.
कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की तेथे उपस्थित सर्व योद्धा आधीपासून त्यांच्या काळशक्ती द्वारा नष्ट झाले असून अर्जुनाला केवळ प्रयत्न करायचा आहे. अर्जुनाने श्रीकृष्णांच्या विश्वरूपात पाहिले की कशा प्रकारे भीष्म, द्रोण, कर्ण इत्यादी सर्व योद्धा काळाद्वारे गिळंकृत होत आहेत. श्रीकृष्णांची इच्छा होती की अर्जुनाने मात्र निमित्तमात्र प्रयत्न करावा. खरेतर, जीवात्मा प्रयत्नाशिवाय आणखी काय करू शकतो? त्यामुळे पूर्ण शक्ती लावून प्रयत्न करणेच खरी सफलता आहे, त्यामुळे प्रयत्न करणे हीच भक्ती आहे. आणि, परिणाम नव्हे तर प्रयत्न न केल्यास ती आपली विफलता असेल.
भक्ती एक अशी शर्यत आहे ज्यात प्रत्येकाला सुवर्णपदक मिळते; एखाद्याला आधी तर दुसर्याला नंतर. आपण यशापशाचा विचार न करता केवळ शर्यतीत टिकून रहायचे आहे. आपल्या पुढे धावण्यार्या व्यक्तीचा द्वेष का करावा? आणि, आपल्या मागील व्यक्तीला पाहून अभिमान का ठेवावा? भक्तीमार्गावर पतन झाले तर पुन्हा उठून धावू लागा. गरज पडल्यास थोडा विश्राम घ्या. इतरांना पुढे जात असल्याचे पाहून हताश होऊ नका. भक्ती शर्यतीत धावत राहणे हेच यश आहे, भलेही शर्यत पूर्ण झाली नाही तरी! अशा प्रकारे जीवनभर या शर्यतीत धावत राहिल्यास निश्चितपणे श्रीकृष्ण आपले स्वागत करण्यासाठी उपस्थित असतील. त्यामुळे शर्यतीत धावत राहा! धावत राहा!
– वंशी विहारी दास