या जगाची वार्ता
काही दु:ख आणि पीडा आपल्या जन्माबरोबरच जन्म घेतात आणि काही काळ आणि परिस्थितीवश आपल्याला भोगावे लागतात – जसे, घातक रोक, स्वजनांचा अकाळी मृत्यू, आर्थिक समस्या, फसविले जाणे, भय तसेच विविध सामाजिक तसेच व्यक्तिगत कारणांमुळे मानसिक तनाण अथवा चिंता.
अशा परिस्थितीत आपण सहसा हताश होतो किंवा रक्षात्मक भूमिका घेऊन इतर लोकांना आपल्या दु:खांसाठी दोषी ठरवू लागतो.
निवड आपल्याच हातामध्ये आहे. एकतर या नकारात्मक विचारांना प्रवेश देऊन आपल्या चेतनेला खाली पाडून भावी कष्टांची बीज रोवावे, अथवा या सर्वांमधून शिकवण घेऊन अशा सकारात्मक व्यवहार, विचार तसेच कार्यांची निवड करावी ज्याद्वारे या समस्यांना मूळापासून नष्ट करता येईल.
बाह्य रूपाने या आव्हानांना सामोरे जाणे आवश्यक आहे. परंतु, ही आव्हाने कधीच न संपणारी असल्याने आपल्या आंतरिक जीवनाचा पाया भक्कम करून आपण त्यांना पार करू शकतो.
देहात्मबुद्धीत राहून आपण आव्हानांचा सामना केल्यास आपण जिंकून देखील हारल्यासारखे आहोत, कारण एक दिवस निश्चितच हे जड शरीर नष्ट होणारच. परंतु, आत्मस्तरावर याचा सामना केल्यास आपण पाहू की हे शरीर, जग आणि येथील सर्व कार्ये काळाच्या प्रभावाखाली कार्य करीत आहेत. आणि इतकेच नाही, या स्तरावर आपण चिखलात उमलणार्या कमळाप्रमाणे बनू.
आत्मस्तरावर कार्ये कशी करावीत?
ब्रह्मदेव श्रीमद्भागवतात (10.14.8) सांगतात की जो व्यक्ती आपल्या दु:खांना पूर्वजन्मीचे फळ मानून धैर्यपूर्वक सहन करतो तसेच या संघर्षपूर्ण परिस्थितीत कृतज्ञतापूर्वक आपल्या अंत:करण, वाणी आणि शरीराद्वारे भगवंतांचे आभार व्यक्त करतो, तो मुक्तीचा अधिकारी बनतो.
भागवतात याची अनेक उदाहरणे आहेत. परीक्षित महाराजांना छोटाशा चुकीसाठी सात दिवसांमध्ये मृत्यूचा शाप मिळाला. चित्रकेतू महाराजांना पार्वती देवीने ब्रह्मराक्षस बनण्याचा शाप दिला. भगवान शंकरांची अकारण निंदा करण्यात आली. बळी महाराज एका क्षणात संपूर्ण त्रैलोक्याचे साम्राज्य गमावून बसले. अशा उदाहरणांद्वारे भक्तांनी दाखविले की कशा प्रकारे आपण नशीबाला भगवंतांची इच्छा मानून कृतज्ञतापूर्वक त्याचा स्वीकार करून भगवंतांचा आश्रय घ्यावा.
पाचशे वर्षांपूर्वी बंगालमध्ये सुबुद्धीराय नामक जमीनदारावर एक मुसलमान नवाब आपले उष्टे पानी टाकून त्याची जात भ्रष्ट करतो. हिंदू समाजाकडून त्यांना बहिष्कृत करून उकळणारे घृत पिण्याचा सल्ला दिला जातो. या मानसिक यातनांमध्ये त्यांची भेट श्री चैतन्य महाप्रभूंशी होते, जे त्यांना हरे कृष्ण महामंत्राच्या कीर्तनाद्वारे भगवंतांचा आश्रय घेण्याचा सल्ला देतात.
याच्या तात्पर्यात श्रील प्रभुपाद लिहितात –
हे हरिनाम संकीर्तन समस्त पापांवरील उपाय आहे. कलियुगात अनेकानेक सामाजिक, राजकीय तसेच धार्मिक समस्यांद्वारे प्रत्येक व्यक्ती त्रस्त आहे आणि परिणामस्वरूप कोणीच सुखी नाही. असे अनेक प्रकारचे मूर्ख आहेत जे लोकांना निरनिराळ्या प्रकारची जीवनशैली जगण्याचा सल्ला देतात. परंतु, आपण पुढील जीवनाची तयारी करून या सर्व त्रासांतून स्वत:ची मुक्तता करू शकतो. आपली मूळ स्वरूपस्थिती जाणून आपण भगवद्धामात परतले पाहिजे.
भगवंतच आपले खरे माता, पिता, मित्र, बंधू आणि सुहृद आहेत. ते कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनविण्यासाठी सक्षम आहेत. भूतकाळाला बदलण्याचा प्रयत्न म्हणजे मूर्खपणा आहे आणि त्यावर शोक करणे म्हणजे शूद्रपणा आहे.
सुखी जीवन हे पुण्यकर्मांचे फळ आहे. त्याप्रमाणे पापांचे फल याउलट असते. परंतु, हे सर्व भौतिक असून आपल्या नशीबानुसार चालते. आपली पाप-पुण्य कार्ये आपण बदलू शकत नाही. हे शक्य नाही. परंतु, कृष्णभक्तीद्वारे आपली भौतिक स्थिती अवश्य बदलू शकतो. आपण उच्चकोटीचे कृष्णभक्त बनू शकता.
पांडवांच्या वनवासादरम्यान यक्षाने युधिष्ठिरांना प्रश्न विचारला, “या जगाची काय वार्ता आहे?”
“हे जग मोठ्या कडईप्रमाणे असून त्यात प्रत्येक जीव तळला जात आहे, ” महाराज युधिष्ठिरांनी उत्तर दिले. बुद्धिमान भक्त या जगातील दावानलाकडे पाहून उद्विग्न न होता त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो.
हे जाणून की, हे जग कडुनिंबाच्या झाडाप्रमाणे आहे, ज्याच्या मुळाशी टनभर गुळाचे पाणी टाकले तरी त्यातून गोड फळे येणार नाहीत – तो अशा ठिकाणी सुखी बनण्याच्या मधुर कल्पना करीत बसत नाही. याबरोबर तो इतरांवर दोषारोपण, निंदा तसेच तक्रारीच्या भावनेतून मुक्त राहतो.
बुद्धिमान व्यक्तीने भक्त बनून या जगाचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न न करता कृष्णभक्ती तसेच हरे कृष्ण महामंत्राचा – हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम हरे राम राम राम हरे हरे॥ – अंगीकार करून या जगातून बाहेर पडून भगवद्धामी पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे केल्यानेच आपण परमसौभाग्यशाली बनू शकतो.
तेव्हाच आपण जाणू शकतो की भौतिक जगातील दु:खे ही खरेतर भगवंतांचीच करुणापूर्ण योजना आहे.
– वंशीबिहारी दास