आध्यात्मिक जीवन म्हणजे संबंधांचा त्याग नव्हे तर प्रत्येक
प्राण्याला भगवंतांच्या कुटुंबातील एक सदस्याच्या रूपात पाहणे आहे.
– गौरांग दर्शन दास
प्रत्येक प्राण्यात प्रेम करणे आणि प्रेम प्राप्त करण्याची इच्छा आहे. प्रत्येक प्राणी अशा सुदृढ संबंधाची इच्छा करतो ज्याद्वारे तो अशा लोकांबरोबर आपले सुख वाटू शकेल आणि कष्टांना पार करण्यासाठी आधार प्राप्त करू शकेल.
अनेकदा आपणास एकांत हवा असतो; परंतु अगदी क्वचितच् लोक एकांतात राहू शकतात. अगदी परम भगवान श्रीकृष्ण देखील, जे आत्मतृप्त तसेच आत्मपूर्ण आहेत, ते देखील आपल्या भक्तांबरोबर सुखद संबंध स्थापित करू इच्छितात. ते श्रीमद्भागवतात (9.4.64) सांगतात की, “हे ब्राह्मणश्रेष्ठ, मी साधुसंतांची एकमेव गती असल्यामुळे त्यांच्या संगतीविना मला दिव्य आनंद आणि परम ऐश्वर्यांना देखील भोगण्याची इच्छा होत नाही.”
आपण श्रीकृष्णांचे अंश आहोत आणि म्हणून आपणासर्वांचा त्यांच्याशी शाश्वत संबंध आहे. या दृष्टीकोणातून प्रत्येक प्राणी श्रीकृष्णांशी संबंधीत आहे. परंतु, किती लोक या गोष्टीचा अनुभव करून त्यानुसार कार्य करतात? या लेखात आपण कृष्णभक्तीच्या आधारावर सुदृढ संबंध स्थापित करण्याबाबत चर्चा करू.
अध्यात्म संबंधांना बाधित करते का?
सामान्यत: लोकांची ही धारणा आहे की आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी आपण संबंधांना त्यागले पाहिजे जेणेकरून एकाग्र होऊन साधना केली जाऊ शकेल. परंतु, खरेतर आध्यात्मिक जीवनात संबंधांचे गहन महत्व आहे. आध्यात्मिक जीवनाचा अर्थ हा नाही की आपण भगवंतांशी संबंध बनविण्याच्या नावाखाली संपूर्ण जगाशी संबंध तोडून टाकावा. जर भगवंत समस्त प्राणीजगताचे पिता आहेत तर कशा प्रकारे आपण त्यांच्या इतर संतानांशी असलेला संबंध तोडून त्यांच्याशी संबंध साधू शकतो?
श्रीमद्भागवत वर्णन करते की एक भक्त सर्व प्राण्यांना आपला मित्र मानतो (सुहृद: सर्वदेहिनाम्) आणि तो कोणाशीही शत्रुत्वभाव ठेवत नाही (अजातशत्रव:). श्रीमद्भागवताच्या पहिल्या स्कंधात महाराज परीक्षितांचे वर्णन येते. ते प्रार्थना करता –
पुनश्च भूयाद्भगवत्यनन्ते
रतिः प्रस‘श्च तदाश्रयेषु।
महत्सु यां यामुपयामि सृष्टिं
मैत्र्यस्तु सर्वत्र नमो द्विजेभ्यः॥
“तुम्हा सर्व ब्राह्मणमंडळींना माझा नमस्कार असो. पुन: पुन्हा माझे हेच मागणे आहे की, जर मला या भौतिक जगात पुन्हा जन्म मिळणार असेल तर त्या जन्मातही अनंतशक्ती भगवान श्रीकृष्णांच्या ठायी माझी पूर्ण आसक्ती असावी, त्यांच्या भक्तांची संगती मला निरंतर लाभावी, आणि सर्व जीवांशी माझे जीव्हाळ्याचे संबंध असावेत.” (श्रीमद्भागवत 1.19.16)
परीक्षित महाराजांना जरी सात दिवसात मृत्यू येण्याचा शाप मिळाला होता, तरी ते मृत्यूबाबत भयभीत नव्हते तसेच त्यांच्यात मोक्षाची देखील कामना नव्हती. त्यांची एकमात्र इच्छा होती की जरी त्यांना पुन्हा या जगात जन्म घ्यावा लागला तरी त्यांना सर्व प्राणिमात्रांशी मैत्रीपूर्ण व्यवहार करता यावा आणि त्यांना भगवद्भक्तांचा संग मिळावा. ते जाणत होते की प्रत्येक प्राणी भगवंतांची संतान आहे.
परंतु, सर्व प्राणिमात्रांप्रति मैत्रीपूर्ण संबंध असण्याचा अर्थ काय आहे? मग, दुर्जन व्यक्तीशी देखील आपण मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवावा का?
संबंधांमधील भेद
श्रील रूप गोस्वामी वर्णन करतात की आध्यात्मिक प्रगतीसाठी आपण समान मानसिकता असणार्या भक्तांशी संबंध ठेवला पाहिजे (सजातीयाशय स्निग्ध श्रीभगवद्भक्तसङ्गे). आणि, श्री चैतन्य महाप्रभू देखील आपणास सावध करतात की आपण भगवद्द्वेषी लोकांबरोबर घनिष्ठ संबंध ठेवू नये (असत्सङ्गत्याग), कारण असा संबंध भक्तीतील आपली रूची नष्ट करू शकतो.
साधकाने अनुकूल तसेच प्रतिकूल संबंधातील फरक समजला पाहिजे. साधकाने केवळ अशा भक्तांशी संबंध ठेवावा ज्यांचा एकमेव उद्देश कृष्णप्रेम प्राप्त करणे आहे.
याचा अर्थ असा नाही की भक्ताने सांसारिक लोकांप्रति घृणा करावी. एखाद्या व्यक्तीला संक्रामक रोग झाल्यास आत्मरक्षण करण्यासाठी आपण त्याच्यापासून दूर राहिले पाहिजे. परंतु, आपण रोग्याची घृणा करीत नाही. त्याचप्रमाणे आपण भक्तीचे रक्षण करण्यासाठी सांसारिक लोकांपासून दूर राहावे, मात्र त्यांच्याप्रति घृणा ठेवू नये. ज्याप्रमाणे परीक्षित महाराजांनी प्रार्थना केली, भक्त देखील सर्व जीवांप्रति प्रेमाच्या संबंधाची इच्छा करतो. परंतु, काही लोकांच्या निकृष्ट मानसिकतेमुळे आपण त्यांच्या घनिष्ट संबंध ठेवत नाही.
सांसारिक लोकांशी संबंध
श्रीमद्भागवतात (11.5.6) सांगितले आहे की, भगवद्भजन न करणारे भौतिकवादी लोक दोन प्रकारचे असतात – अज्ञानी आणि उदंड. भक्त अज्ञानी अथवा अबोध व्यक्तीला ज्ञान देऊन त्याचा उद्धार करण्याचा प्रयत्न करतात आणि उदंडी लोकांपासून दूर राहतात, कारण अशा लोकांच्या संगतीमुळे आपल्या भक्तीमध्ये बाधा उत्पन्न होते. दयाळू भक्त कधीच कोणाप्रति दुर्भावना न ठेवता सदैव जनकल्याणासाठी प्रार्थना करीत असतो.
खरेतर, भक्त त्याप्रति द्वेषी असलेल्या व्यक्तीचा देखील द्वेष करीत नाही. युधिष्ठिर महाराजांनी कधीच दुर्याधनाचा द्वेष केला नाही. हिरण्यकशिपूने प्रह्लादाला ठार मारण्याचे अनेक प्रयत्न केले तरी प्रह्लादाने त्याचा कधीच द्वेष केला नाही. याउलट त्यांनी भगवान नृसिंहदेवांकडे हिरण्यकशिपूला मुक्ती देण्यासाठी प्रार्थना केली. त्यांनी त्या सर्व भौतिकवादी लोकांसाठी प्रार्थना केली जे इंद्रियभोगाच्या लालसेपोटी भगवंतांशी त्यांचा असलेल्या संबंधाची उपेक्षा करीत आहेत.
वृंदावनातील षड्गोस्वामींविषयी सांगितले जाते – धीराधीर जना प्रियौ प्रियकरौ निर्मत्सरौ पूजितौ। अर्थात – ते कोणाहीप्रति द्वेष करीत नसल्याने ते सज्जन तसेच दुर्जनांद्वारे देखील पूजनीय होते. अशा प्रकारे आपण जर या षड्गोस्वामींच्या चरणचिह्नांचे अनुगमन करीत द्वेषमुक्त राहून जनहितासाठी प्रार्थना केल्यास आपण स्वत:चा तसेच इतरांचे कल्याण करू शकू.
श्रीमद्भागवतात (11.2.46) सांगितले आहे की, श्रीकृष्णांशी प्रेम करणारा व्यक्ती इतर भक्तांप्रति मैत्रीपूर्ण संबंध ठेवतो, अज्ञानी लोकांवर दया दाखवितो आणि द्वेषी लोकांपासून दूर राहतो. या संदर्भात मथुरेतील फुले विकणार्या सुदामाची कथा आहे. मथुरेत भ्रमण करताना श्रीकृष्ण सुदामाच्या घरी पोहोचले. सुदामाने सुंदर, सुगंधी पुष्पमाला श्रीकृष्ण आणि त्यांच्या मित्रांना अर्पण केली. अत्यंत प्रसन्न झाल्याने श्रीकृष्णांनी सुदामाला वर मागण्यास सांगितले. यावेळी सुदामाने श्रीकृष्णांकडून तीन गोष्टी मागितल्या –
सोऽपि वव्रेऽचलां भक्तिं
तस्मिन्न एवाखिलात्मनि।
तद्भक्तेषु च सौहार्दं
भूतेषु न दयां पराम्॥
“सुदामा माळकर्यानेही त्या उभयतांकडून अखिलात्मा श्रीकृष्णांच्या ठिकाणी अटळ भक्ती, त्यांच्या भक्तांशी मैत्री आणि अखिल प्राणिमात्रांच्या ठिकाणी दिव्य दयाभाव असे वर मागून घेतले.” (भागवत 10.41.51)
भौतिक संबंधांना
अध्यात्मीकृत करणे
कुरुक्षेत्रावरील युद्धानंतर श्रीकृष्ण हस्तिनापुरातून आपली राजधानी, द्वारकेकडे प्रस्थान करीत होते. त्यावेळी कुंतीदेवी त्यांना हस्तिनापुरात आणखी काही दिवस राहण्यासाठी विनंती करते, जेणेकरून श्रीकृष्ण तिचे पुत्र असणार्या पांडवांचे रक्षण करू शकतील. परंतु, त्यावेळी ती संभ्रमात पडते, कारण द्वारकेत देखील श्रीकृष्णांचे संबधी होते, ज्यांना त्यांच्या रक्षणाची आवश्यकता होती. तेव्हा ती प्रार्थना करते –
अथ विश्वेश विश्वात्मन्
विश्वमूर्ते स्वकेषु मन।
स्नेह पाशमिमं छिन्धि
दृढं पाण्डुषु वृष्णिषु॥
त्वयि मेऽनन्यविषया
मतिर्मधुपतेऽसकृत्।
रतिमुद्वहतादद्धा गङ्गेवौघमुदन्वति॥
“हे जगाचे स्वामी, तुम्ही जगाचे आत्मा आहात, विश्वरूपाने मूर्तिमान आहात. कृपया माझे पांडव आणि वृष्णी कुळातील स्वजनांशी असलेले दृढ स्नेहसंबंध तोडून टाका. हे मधुपती, ज्याप्रमाणे गंगा कोणत्याही अडथळ्याविना सागराकडे अखंडपणे वाहत राहते, त्याप्रमाणे माझे लक्ष दुसरीकडे न लागता अखंडपणे तुमच्या ठायी स्थिर राहावे.” (भागवत 1.8.41-42)
निश्चितच कुंतीदेवी भक्तीच्या अत्युच्च स्तरावर स्थित आहे आणि आपल्या स्नेहपाशाला कापून टाकण्यासाठी तिची प्रार्थना अत्यंत गुह्य आहे; परंतु भक्तिमार्गातील आचार्यांच्या शिकवणींच्या आधारावर सांगायचे झाल्यास आपणास भगवंतांशी संबंध स्थापित करताना कौटुंबिक संबंधांना त्यागण्याची आवश्यकता नाही. आपण केवळ श्रीकृष्णांना आपल्या कुटूंबाचे केंद्र बनवून जीवनयापन केले पाहिजे. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर लिहितात की कुंतीदेवी आपल्या कुटुंबाशी संबंध कापण्याची गोष्ट करीत आहे; मात्र ती त्यांच्याशी आध्यात्मिक संबंधाचा देखील त्याग करण्याची गोष्ट करीत नाही. पांडव तसेच वृष्णींबरोबर तिची दोन प्रकारचे संबंध होते – शरीराचा संबंध आणि आत्म्याचा संबंध. कुंतीदेवी शारीरिक स्तरावर आपल्या परिजनांप्रति आसक्तीला कमी करून आध्यात्मिक स्तरावरील संबंधाला दृढ बनवू इच्छित होती. अशा प्रकारे आपण आपल्या संबंधांना अध्यात्मीकृत करून त्यांना देखील श्रीकृष्णांकडे घेऊन जाऊ शकतो.
आत्मीय संबंधांची पूंजी
केवळ भक्तांच्या संगतीतच भक्तिमार्गावर प्रगती केली जाऊ शकते. भक्तांशी संबंध स्थापित करताना आपण त्यांच्याबरोबरील व्यवहार, वाणी तसेच भावनांचा प्रयोग सावधपणे केला पाहिजे. अभक्तांशी आपले संबंध प्राय: शोषण तसेच अहंकाराचे पोषण करणारे असतात; मात्र भक्तांबरोबरील संबंध नि:स्वार्थ भावना आणि सेवेवर आधारित असले पाहिजेत. संबंधांना टिकवून ठेवण्यासाठी संवेदना, सहानुभूती, क्षमा, कृतज्ञता आणि जीवनातील चढ-उतारांमध्ये परस्परांना आधार देण्यात तत्परता दाखविण्याची आवश्यकता आहे. हे गुण आपल्या संबंधांचे पोषण करतात आणि त्यांना सुदृढ बनवितात.
याशिवाय श्रील रूप गोस्वाम प्रेमपूर्ण सहा कार्यांचे वर्णन करतात जे भक्तांमधील परस्पर संबंधांचे पोषण करतात –
ददाति प्रतिगृह्णाति गुह्यमाख्याति पृच्छति।
भुङ्कते भोजयते चैव षड्विधं प्रीतिलक्षणम्॥
“भेट देणे आणि भेट स्वीकार करणे, विश्वासाने एखाद्याला आपल्या मनातील गोष्ट सांगणे आणि त्यांच्या मनातील गोष्ट ऐकणे, प्रसाद स्वीकार करणे आणि इतरांना देणे – ही भक्तांमध्ये आढळणारी सहा प्रीतीलक्षणे आहेत.” (उपदेशामृत, श्लोक 4) आपण कोणाबरोबरही या सहा प्रकारे प्रेमाचे आदान-प्रदान करतो त्यांच्याशी आपला संबंध प्रगाढ होऊ लागतो.
भागवतात (1.7.11) शुकदेव गोस्वामींच्या माध्यमातून एक अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा सिद्धा केला आहे. सर्व भक्त शुकदेवांशी प्रेम करीत होते आणि ते देखील सर्वांशी प्रेम करीत होते (नित्यं विष्णुजनप्रिय:). ते सर्वांवर आणि सर्वजण त्यांच्यावर का प्रेम करीत होते? कारण ते सदैव श्रीकृष्णांच्या गुणांमध्ये निमग्न रहात होते (हरेर्गुणाक्षिप्तमति:). आणि, भगवंतांप्रति त्यांचे हे उत्कट प्रेम कशा प्रकारे विकसित झाले? श्रीमद्भागवताच्या श्रवण आणि अध्यायामुळे. म्हणून आपण मन:पूर्वक श्रीमद्भागवताचे श्रवण करतो, सर्वाकर्षक भगवंतांना आपल्या हृदयसिंहासनावर विराजमान करतो तेव्हा सर्व भक्तांचे हृदय आकर्षित होऊ लागतात.
श्रीकृष्ण सांगतात की त्यांचे भक्त आपल्या सर्व चर्चा त्यांनाच केंद्रस्थानी ठेवून करीत असतात. परस्परांना श्रीकृष्णांविषयी ज्ञान देऊन भक्तांमधील प्रेम वाढू लागते. वृंदावनातील षड्गोस्वामी याचे उदाहरण आहेत.
सुदृढ संबंधांसाठी कृष्णकथा
श्रीकृष्णांच्या गुणांप्रति आकर्षण तसेच कृष्णकथेतील तल्लिनता, ही दोन कार्ये भक्तांशी आपल्या संबंधामध्ये प्रेम आणि तृप्ती प्रदान करतात. श्रीकृष्ण गीतेत (10.9) सांगतात,
मच्चित्ता मद्गताप्राणा
बोधयन्त: परस्परम्।
कथयन्तश्च मां नित्यं
तुष्यन्ति च रमन्ति च॥
“माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते, त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते, आणि एकमेकांमध्ये माझ्याविषयी चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्यधिक संतोष तथा आनंद प्राप्त होतो.”
आपण या कृष्णकथा मंदिरांमध्ये, सभागृहांमध्ये, रथयात्रांमध्ये, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तसेच ऑनलॉईन चर्चांमध्ये एकत्र येऊन करू शकतो. किंवा, एखाद्या वैष्णव मित्रांशी श्रीकृष्णांच्या गुण, लीला, नाम इत्यादींविषयी चर्चा करू शकतो.
अनेकदा भक्त आपल्या सेवा, समाचार अथवा आपल्या जीवनातील आव्हानांविषयी चर्चा करतात. ते आपले अनुभव सातात आणि कधी कधी इतर चर्चा देखील करतात. काही चर्चा व्यवहारिक जीवनात आवश्यक असते तर काही नसतात. परंतु, भक्तांबरोबरील चर्चेमध्ये श्रीकृष्णांविषयी काहीतरी चर्चा केल्याने भक्तांबरोबर आपले संबंध सुदृढ बनतात आणि परिणामत: दोघांमध्येही भक्ती तसेच श्रीकृष्णांप्रति प्रेम विकसित होऊ लागते.
समान चित्त आणि समान ध्येय असणार्या भक्तांच्या संगतीत श्रीकृष्णांच्या गुणांचे रसास्वादन केल्याने दोन्ही पक्षांमध्ये प्रेमाचा संबंध प्रगाढ होतो आणि दोघेही परस्परांच्या आध्यात्मिक भावनांचे पोषण करतात. श्री चैतन्यचरितामृतातील अनेक प्रसंगांमध्ये ही गोष्ट पहावयास मिळते. उदाहरणार्थ, आंध्र प्रदेशातील गोदावरी नदीच्या किनारी श्री चैतन्य महाप्रभू आणि रामानंद राय यांनी दहा दिवसांपर्यंत श्रीकृष्णांचे गुण आणि लीलांविषयी चर्चा केली. जगन्नाथपुरीत महाप्रभू नियमितपणे सिद्धबकुळ जवळ रूप गोस्वामी आणि हरिदास ठाकूर यांच्याबरोबर बसून सविस्तारपणे कृष्णकथा करीत. रामानंद राय आणि प्रद्युम्न मिश्र यांच्यामध्ये तासंतास चालेल्या कृष्णकथेचे वर्णन मिळते. जगन्नाथपुरीला जाताना श्री चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू, जगदानंद, दामोदर तसेच मुकुंद यांच्या द्वारा साक्षी गोपाल मंदिर तसेच क्षीरचोर गोपीनाथ मंदिराच्या यात्रेदरम्यान त्यांच्यातील कृष्णकथेविषयी चर्चांचे वर्णन प्राप्त होते.
जेव्हा एक भक्त श्रीकृष्णांचे गुणगान करतो तेव्हा ते ऐकणारा भक्त त्या भक्ताच्या हृदयातील श्रीकृष्णांप्रति असलेल्या प्रेमाचा अनुभव करू शकतो. अशा प्रकारे भक्त परस्परांना श्रीकृष्णांच्या जवळ आणू लागतात.
भगवंतांच्या प्रसन्नतेखातर मैत्रीपूर्ण संबंध
भक्तांमधील कलह तसेच तनावपूर्ण संबंध पाहून भगवंतांचे हृदय दु:खी होते. परंतु, त्यांमध्ये प्रेमाचा संबंध पाहून भगवंत प्रसन्न होऊन त्यांना समस्त वरदान तसेच आशीर्वाद प्रदान करतात. प्रचेतांमधील प्रेमाचा संबंध याचे उदाहरण आहे, ज्यांनी दहा हजार वर्षे एकत्रीतपणे जलमग्न होऊन तपस्या केली होती. त्यांची प्रशंसा करताना भगवंत म्हणतात,
वरं वृणीध्वं भद्रं वो यूयं मे नृपनन्दना:।
सौहार्देनापृथग्धर्मास्तुष्टोऽहं सौहृदेन व:॥
“हे राजकुमारांनो! तुम्हा परस्परांमधील मैत्रीपूर्ण संबंधामुळे मी फार संतुष्ट झालो आहे. तुम्ही सर्वजण भक्तिमय सेवा हे एकमेव कार्य करीत आहात. तुमच्या सख्यामुळे मी इतका प्रसन्न झालो आहे की मी तुमचे कल्याण इच्छितो. आता तुम्ही माझ्याकडून वर मागून घ्या.” (भागवत 4.30.8)
समानता आणि विशिष्टता
प्रचेतांप्रमाणे पांडवांचे देखील सुंदर उदाहरण आहे. पाच पांडवांचे आपला स्वतंत्र स्वभाव असला तरी ते सर्वजण प्रेमाच्या बंधनाद्वारे बांधले गेले होते. युधिष्ठिर महाराज धार्मिक राजा होते, भीम अतुलनीय शारीरिक बळाचा स्वामी होता, अर्जुन निपुण धनुर्धर होता आणि नकुल-सहदेवांकडे देखील आपली एक प्रतिभा होती. या पाचही भावंडांचे स्वभाव तसेच प्रतिभा निराळ्या असल्या तरी त्यांच्यात कधीच भेदभाव नव्हता. ते नेहमी श्रीकृष्णांना केंद्रस्थानी ठेवून कार्य करीत. त्यांच्या सर्वांच्या हृदयात श्रीकृष्णांप्रति अपार प्रेम होते, जे त्या पाचही जणांना नेहमी एकत्र ठेवत असे. श्रीकृष्णांना आपला सारथी बनविण्याचे सौभाग्य जरी केवळ अर्जुनाला प्राप्त झाले, तरी इतर पांडवांना त्याविषयी ईर्षा वाटली नाही. आणि, कुरुक्षेत्राच्या युद्धात भीम आणि अर्जुन खरे युद्धा ठरले तरी विजय प्राप्त झाल्यावर त्यांनी स्वत: राजा बनण्याचा विचार केला नाही. त्यांनी सहर्षपणे आपला मोठा भाऊ, युधिष्ठिरांना राजसिंहासनावर आरूढ केले.
श्रीकृष्णांना केंद्रस्थानी ठेवून आपण स्वत:चा तसेच इतरांच्या स्वभावाचा चांगल्याप्रकारे सम्मान करू शकतो. श्रीकृष्णांचे नीज निवासस्थान, वृंदावनातील संबंध याच सिद्धान्तावर आधारित आहेत. तेथील प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी श्रीकृष्णांना ठेवून कार्य करतो. याच सिद्धान्तानुसार कार्य केल्यास आपण देखील परस्परांमध्ये प्रेमसंबंध निर्माण करू शकतो. कृष्णकथा तसेच कृष्णसेवेला केंद्रस्थानी ठेवून आपण भक्तांबरोबरील संबंध प्रगाढ बनवू शकतो आणि याबरोबर अज्ञानी लोकांप्रति करुणा दाखवित त्यांना आध्यात्मिक जीवनाविषयी मार्गदर्शन करू शकतो.
गौरांग दर्शन दास प. पू. राधानाथ स्वामींचे शिष्य आहेत आणि ते इस्कॉन गोवर्धन इकोविलेज येथील भक्तिवेदान्त विद्यापीठाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी भागवत-सुबोधिनी तसेच चैतन्य-सुबोधिनी सहित 28 पुस्तकांची रचना केली आहे. ते भारतात विविध ठिकाणी भागवतावरील अभ्यासवर्ग देखील घेतात.