आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाचे संस्थापकाचार्य
कृष्णकृपाश्रीमूर्ती ए.सी.भक्तिवेदान्त स्वामी श्रील प्रभुपादांनी
दिलेले प्रवचन.
स वै पुंसा परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे।
अहैतुक्यप्रतिहता ययात्मा सुप्रसीदति॥
“ज्यामुळे मनुष्याला परम, दिव्य अशा भगवंतांची प्रेममयी भक्ती प्राप्त होते तो अखिल मानव जातीचा परम धर्म होय. अशी भक्ती अहैतुकी (हेतुरहित) आणि अखंड स्वरूपाची असावी. अशा भक्तीने आत्मा पूर्णपणे प्रसन्न होतो, तृप्त होतो.”

या विधानामध्ये श्री सूत गोस्वामी नैमिष्यारण्यातील ऋषींच्या पहिल्या प्रश्नाला उत्तर देत आहेत. ऋषींनी त्यांना अशी विनंती केली की, त्यांनी सर्व शास्त्रांचा सारांश काढावा आणि असा अतिमहत्त्वाचा भाग प्रस्तुत करावा, ज्यामुळे पतित जीव किंवा सामान्य जन तो सहज रीतीने ग्रहण करू शकतील. वेदांमध्ये मानवांसाठी दोन वेगवेगळ्या स्वरूपाचे धर्ममार्ग निश्चित केले आहेत. एक प्रवृत्ती मार्ग किंवा ‘भोगप्रवृत्तीचा मार्ग’ आणि दुसरा निवृत्ती मार्ग किंवा ‘त्याग मार्ग’ भोग प्रवृत्तीचा मार्ग निम्नतर आहे आणि परमार्थासाठी त्यागाचा मार्ग उच्चतर आहे.
जीवांचे भौतिक अस्तित्व ही वास्तविक जीवनाची रोगग्रस्त अवस्था आहे. वास्तविक जीवन म्हणजे आध्यात्मिक अस्तित्व किंवा ब्रह्मभूत स्थिती होय. अशा स्थितीमध्ये जीवन शाश्वत, आनंदपूर्ण आणि ज्ञानपूर्ण असते. भौतिक अस्तित्व अनित्य, मायिक आणि दु:खपूर्ण आहे. याठिकाणी आनंद मुळीच नाही. दु:खांतून मुक्त होण्याचे केवळ निष्फळ प्रयत्न आणि दु:खांची तात्पुरती स्थगिती याला चुकीने ’सूख’ समजले जाते. त्यामुळे प्रगतीशील भौतिक सुखाचा मार्ग हा अनित्य, दु:खमय आणि भ्रामक असल्यामुळे तो कनिष्ठ आहे. परंतु, मनुष्याला शाश्वत, आनंदमय आणि ज्ञानपूर्ण जीवनाकडे नेणारा परम भगवंतांच्या भक्तिमय सेवेचा मार्ग श्रेष्ठ समजला जातो. या मार्गाचा कनिष्ठ मार्गाशी संपर्क झाला तर त्याचे स्वरूप दूषित बनते. उदाहरणार्थ, भौतिक लाभाकरिता भक्तीचा स्वीकार हा निश्चितच त्यागाच्या प्रगतीशील मार्गातील अडथळा आहे. परम-कल्याण साधण्याकरिता त्यागाचा मार्ग हा जीवनाच्या रोगग्रस्त स्थितीतील भोगसुखापेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे. अशा भोगामुळे भौतिक रोगाची लक्षणे अधिक प्रबळ होतात आणि रोगाचा अवधी वाढतो. म्हणून भगवंतांची भक्तिमय सेवा शुद्ध स्वरूपातील असावी म्हणजेच भौतिक सुखाच्या यत्किंचितही इच्छेशिवाय असावी. म्हणून मनुष्याने अनावश्यक इच्छा, सकाम कर्मे किंवा तात्त्विक तर्काचा लवलेशही नसणारा, भगवंतांच्या भक्तिमय सेवेचा परम-धर्म स्वीकारावा. केवळ याचमुळे प्रत्येकजण भगवंतांच्या सेवेत शाश्वत सूख प्राप्त करू शकतो.
जीवाचे अस्तित्व हे भगवंतांसह असणार्या त्याच्या शाश्वत संबंधानुरूप कर्मे करण्यासाठी आहे. श्रीकृष्ण हे जीवाचे मध्यवर्ती तत्त्व आहेत. ते सर्वाकर्षक जीव किंवा इतर सर्व जीवांमध्ये किंवा शाश्वत रूपांमध्ये सर्वांपेक्षा शाश्वत रूप आहेत. आध्यात्मिक अस्तित्वामध्ये प्रत्येक जीवाला स्वत:चे नित्यस्वरूप आहे आणि श्रीकृष्ण त्या सर्वांचे शाश्वत आकर्षण आहेत. श्रीकृष्ण परिपूर्ण आहेत आणि इतर सर्व त्यांचे अंश आहेत. श्रीकृष्ण आणि जीव यातील संबंध स्वामी-सेवक असा आहे. तो संबंध दिव्य आहे आणि भौतिक अस्तित्वातील आपल्या अनुभवाहून पूर्णपणे भिन्न आहे. हा स्वामी-सेवकाचा संबंध म्हणजेच सलगीचे अत्यंत स्नेहपूर्ण स्वरूप आहे. भक्तिमय सेवेमध्ये जशी प्रगती होईल तसतसा याचा साक्षात्कार होईल. भौतिक अस्तित्वातील वर्तमान बद्धावस्थेतही प्रत्येकाने स्वत:ला भगवंतांच्या त्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न करावे. त्यामुळे मनुष्याला वास्तविक जीवनाचा मार्ग सापडेल आणि मनुष्य पूर्ण समाधानी होईल.
आपण सर्वजण पूर्ण आत्म-संतुष्टीची किंवा आत्म-प्रसादाची आकांक्षा करीत आहोत. परंतु, प्रथम वास्तविक ‘आत्मा’ म्हणजे काय हे आपण जाणून घेतले पाहिजे. ‘आत्मा’ हा शब्द देह, मन आणि आत्म्याच्या संदर्भात वापरला जातो. वस्तुत: आपण दोन प्रकारच्या कपड्यांनी आच्छादिलेला ‘आत्मा’ आहोत. ज्याप्रमाणे एखादा सभ्य गृहस्थ आपल्या कोट आणि सदर्याने आच्छादिलेला असतो, त्याचप्रमाणे मी जीवात्माही भौतिक इंद्रियांनी बनलेल्या स्थूल शरीराने आणि मन, बुद्धी, मिथ्या अहंकाराने बनलेल्या सूक्ष्म देहाने आच्छादिलेलो आहे. मिथ्या अहंकाराने आवृत्त झालेली व्यक्ती स्वत:ला हा देह समजते. “तुम्ही कोण आहात?” असे विचारले असता तो उत्तर देईल, “मी अमेरिकन आहे” किंवा “मी भारतीय आहे” इत्यादी. परंतु, या सर्व शारीरिक उपाधी आहेत, ती काही आपली वास्तविक ओळख नव्हे.
जेव्हा मनुष्य विचार करतो, “अहं ब्रह्मास्मि – मी ब्रह्म किंवा जीवात्मा आहे,’ तेव्हा त्याच्या वास्तविक स्वरूपाची जाणीव होण्यास सुरुवात होते, असे वैदिक शास्त्रांचे मत आहे. म्हणूनच वेदान्त सूत्र सुचविते, अथातो ब्रह्मजिज्ञासा – “आता मनुष्याने आत्म्याबद्दल जिज्ञासा केली पाहिजे.” मनुष्य जीवन हे आत्मज्ञानात प्रगती करण्यासाठी आहे, आणि हे ज्ञानच खर्या आनंदाचा आरंभ आहे.
प्रत्येकजण आनंदाची इच्छा करतो, कारण स्वभावत:च आपण आनंदी आहोत, आनन्दमयो भ्यासात्. एक जीवात्मा म्हणून आपण स्वभावत:च आनंदमय आहोत. परंतु, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पाच स्थूल घटकांनी आणि मन, बुद्धी आणि अहंकार या तीन सूक्ष्म घटकांनी आवृत्त असल्यामुळे आपण दु:ख भोगीत आहोत. स्वत:ला या आच्छादनांशी एकरूप समजणारे भौतिकवादी शरीराच्या या स्थूल आणि सूक्ष्म घटकांद्वारे समाधान मिळवू पाहतात. दुसर्या शब्दांत, त्यांना केवळ इंद्रियतृप्ती हवी असते, शारीरिक तुष्टी हवी असते. भौतिक जगामध्ये केवळ हा आनंद मिळविण्यासाठी प्रत्येकजण कठोर परिश्रम करीत आहे. काही लोक भौतिक इंद्रियांची संतुष्टी करून आनंदी होण्याचा प्रयत्न करतात आणि काही लोक कला, काव्य आणि तत्त्वज्ञानासारख्या माध्यमांद्वारे मनाची तुष्टी करून आनंदी होण्याचा प्रयत्न करतात. परंतु, स्थूल किंवा सूक्ष्म इंद्रियतृप्तीही त्यांना खरा आनंद देऊ शकत नाही, कारण खरा आनंद आत्म्याशी संबंधित आहे आणि संपूर्ण जगभर लोक शरीर सुखासाठी, इंद्रियतृप्तीसाठी प्रयत्न करीत असूनही ते आनंदी नाहीत. ते आनंदी होऊ शकत नाहीत, कारण आनंदाच्या मूळभूत तत्त्वांविषयी ते अज्ञानी आहेत.
समजा, तुमच्याकडे एक सुंदर सदरा आहे, जर तुम्ही तो केवळ इतरांना दाखविला, त्याला इस्त्री केली आणि तो काळजीपूर्वक ठेवला, तर तुम्ही कधीच आनंदी होणार नाही. त्याचप्रमाणे, आता तुम्ही शरीररूपी सदर्याची तुष्टी करून आनंद मिळविण्याचा प्रयत्न करीत आहात; परंतु ते कदापि शक्य नाही. आत्म्याला संतुष्ट केले तरच खरा आनंद अनुभवता येईल. समजा, तुमच्याकडे पिंजर्यामध्ये एक पक्षी आहे. जर तुम्ही केवळ पिंजरा स्वच्छे केला, पण पक्ष्याला काहीच अन्न दिले नाहीत तर तो कधीच सुखी होणार नाही. त्याचप्रमाणे, भौतिक शरीर म्हणजे आत्म्याासाठी एक पिंजरा आहे आणि आपण केवळ शरीराचीच काळजी गेतली तर आत्मा कधीच सुखी होणार नाही. त्यामुळे आध्यात्मिक ज्ञानाची सुरुवात म्हणजे आत्मा हा मन आणि शरीरामध्ये बद्ध झालेला आहे आणि शारीरिक सुविधा किंवा मानसिक समाधान देखील आत्म्याला खरा आनंद देऊ शकणार नाहीत, हे जाणून घेणे होय.
मग, आत्मा सुखी कसा होईल? श्रीमद्भागवताच्या या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे परम-धर्मानुसार जीवन व्यतित केल्यानेच आत्मा आनंदी होईल. ‘धर्म’ म्हणजे, “ज्यामुळे जीव आपले अस्तित्व धारण करतो’ किंवा “जीवाचा अविभाज्य गुणधर्म”. प्रत्येक वस्तूचा एक अविभाज्य गुण असतो. उदाहरणार्थ, मिरचीचा अविभाज्य गुण म्हणजे तिखट चव. आपण बाजारामध्ये मिरच्या खरेदी करण्यास जातो तेव्हा त्या किती तिखट असतात, ते आपल्याला माहीत असते. त्या जर तिखट नसतील तर आपण त्या विकत घेत नाही. तिखटपणा हा मिरचीचा धर्म आहे. त्याचप्रमाणे, गोड असणे हा साखरेचा धर्म आहे.
तेव्हा, आत्म्याचा धर्म काय? जेव्हा आत्मा भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होतो, तेव्हा शरीराशी मिथ्या तादात्म्य केल्यामुळे तो त्यावर आधारित विविध कृत्रिज्ञ धर्मांचा स्वीकार करतो. हिंदू कुटुंबामध्ये जन्मलेला म्हणेल, “मी हिंदू आहे”; मुस्लिम कुटुंबामध्ये जन्मलेला म्हणेल, “मी मुस्लिम आहे”; खिश्चन कुटुंबामध्ये जन्मलेला म्हणेल, “मी ख्रिश्चन आहे”… इत्यादी. परंतु, मी पूर्वीच स्पष्ट केल्याप्रमाणे ‘आत्मा’ ही मनुष्याची खरी ओळख आहे, अहं ब्रह्मास्मि – “मी म्हणजे आत्मा आहे.”
जेव्हा आपण आध्यात्मिक जाणीवेच्या त्या स्तरावर येतो तेव्हा आपला अविभाज्य गुणधर्म स्पष्टपणे समजतो. येथे स्पष्ट केल्यामुळे स वै पुंसां परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे – आत्म्याचा खरा धर्म म्हणजे भगवंतांची भक्तिमय सेवा करणे. तो आपला अविभाज्य गुणधर्म आहे. प्रत्येकजण पूर्वीपासूनच भक्त आहे – त्याच्या देशाचा, समाजाचा, कुटुंबाचा, पत्नीचा, मुलांचा, त्यांच्या इंद्रियांचा वगैरे. “मी कोणाचीही सेवा करू शकत नाही,” असे कोणीही म्हणू शकत नाही. सेवा ही केलीच पाहिजे, कारण तो तुमचा धर्म आहे. ज्याची सेवाकरावी असे कुणीच नसेल तर मनुष्य मांजर किंवा कुत्रा पाळतो आणि त्याची सेवा करतो. कुणाची तरी प्रेममय सेवा करणे, हा आपला अविभाज्य गुण आहे. परंतु, तो मध्यवर्ती केंद्रबिंदू आपल्याला अज्ञात आहे. आपण कुत्री-मांजरे आणि इतर अनेक वस्तूंवर प्रेम करतो; परंतु भगवंतांवर प्रेम करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आपल्याला खरा आनंद मिळत नाही. जेव्हा आपले प्रेम योग्य विषयावर – ‘अधोक्षज’ अर्थात, श्रीकृष्णांवर केंद्रित करू तेव्हाच आपण सुखी होऊ.
तेव्हा ‘धर्म’ या शब्दाचा अर्थ भागवताच्या या श्लोकावरून आपण जाणला पाहिजे की, भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करणे, हाच परमोच्च धर्म आहे. नैमिषारण्य येथे ऋषींनी विचारलेला प्रश्न असा होता, “ज्यामुळे कोणीही आध्यात्मिक मुक्तीप्रत प्रगत होऊ शकेल असा सर्वोच्च धर्म कोणता?” काही लोक म्हणतील की, हिंदू धर्म सर्वोत्तम आहे; इतर लोक ख्रिश्नच धर्म सुचवितील, तर दुसरेजण मुस्लिम धर्म चांगला असल्याचे म्हणतील, काही बौद्ध धर्म चांगला असल्याचे म्हणतील. परंतु, श्रीमद्भागवत हे हिंदू, ख्रिश्नचन, मुस्लिम किंवा बौद्ध धर्माचीही शिफारस करीत नाही. जे सर्वोत्तम धर्माचे सर्वसाधारण वर्णन करते – “जो धर्ममार्ग तुम्हाला अधोक्षजांचा (श्रीकृष्णांचा) भक्त होण्यास पात्र बनवितो, तो सर्वोत्तम धर्म आहे.”
‘अधोक्षज’ हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे संस्कृत भाषेतील भाषेतील नाव आहे. अधोक्षज नावाचा शब्दश: अर्थ म्हणजे, ‘जे इंद्रियांच्या आकलनाने मिळालेल्या ज्ञानाद्वारे त्यांना जाणण्याच्या सर्व प्रयत्नांवर (अक्ष-ज) मात करतात.”
“परमेश्वर कोण आहे?” या प्रश्नावर संशोधन करणार्या आणि ढीगभर पुस्तके लिहिणार्या मानसिक तर्कवाद्यांना भगवंतांचे ‘अधोक्षज’ हे नाव म्हणजे चोख उत्तर आहे. त्यांच्यासाठी ‘अधोक्षज’ हे नाव सुचविते, “तुम्ही हजारो वर्षे तर्क करीत राहाल; परंतु त्याद्वारे तुम्ही भगवंतांना कधीच जाणू शकणार नाही.”
लोक नेहमी म्हणतात, “परमेश्वर महान आहे,” परंतु तो ‘किती’ महान आहे, हे मात्र ते जाणत नाहीत. परमेश्वराची महानता ‘श्रीकृष्ण’ नामाद्वारे पूर्णपणे निर्देशित होते. ‘परमेश्वर’ शब्दाची तुम्हाला परिपूर्ण व्याख्या हवी असेल तर ती म्हणजे ‘श्रीकृष्ण’ या नामाध्येच सामावलेली आहे, कारण ‘श्रीकृष्ण’ म्हणजे ‘सर्वाकर्षक’. भगवंत सर्वाकर्षक असल्याखेरीज ते परमेश्वर कसे असू शकतील? जर एखादी व्यक्ती महान असेल तर ती आकर्षक असतीलच पाहिजे. उदाहरणार्थ, जॉन रॉकफेलर आणि हेन्री फोर्ड यांना महान व्यक्ती मानले जाते, कारण ते अतिशय धनाढ्य होते आणि त्यांच्या संपत्तीने त्यांना आकर्षक बनविले. त्यामुळे ऐश्वर्य आकर्षकतेचा एक भाग आहे. त्यामुळे परमेश्वर सर्वात ऐश्वर्यवान असले पाहिजेच. सौंदर्य देखील आकर्षकतेचा दुसरा भाग आहे – त्यामुळे परमेश्वर सर्वाधिक सुंदर असलेच पाहिजेत. अनेक लोक, जेव्हा श्रीकृष्णांचे चित्र पाहतात, तेव्हा ते किंचित सावळे असले तरी आपण इतकी सुंदर व्यक्ती कधीच पाहिली नसल्याचे मान्य करतात. श्रीकृष्णांकडे बल, ज्ञान, किर्ती आणि वैराग्य ही आकर्षक ऐश्वर्ये पूर्ण प्रमाणात आहेत. इंद्रियांच्या जाणीवेवर आधारित असणार्या मानसिक तर्कांद्वारे अशी अमर्याद आकर्षक लक्षणे जाणणे आपल्याला अशक्य आहे आणि म्हणून भागवताच्या या श्लोकाप्रमाणे श्रीकृष्णांना ‘अधोक्षज’ म्हणून देखील ओळखतात.
येथे श्रीमद्भागवत सर्वोत्तम धर्माची सुलभ व्याख्या सांगत आहे – ज्याद्वारे तुम्ही भगवंतांसाठी तुमच्या प्रेमभक्तीची जोपासना करू शकता, तो धर्म सर्वोत्तम आहे. ही व्याख्या किती सुंदर आहे! तुम्ही ख्रिश्चन, हिंदू, बौद्ध, इस्लाम धर्माचे पालन करा, त्याने काही फरक पडत नाही; परंतु तुम्ही परमेश्वराप्रत किती प्रेम विकसित केले आहे, ही तुमच्या यशाची परीक्षा आहे. जर तुम्ही भगवद्प्रेम विकसित केले असेल तर तुम्ही वस्तुत: धार्मिक तत्त्वांचे पालन केले आहे. धर्माचा अर्थ असा नव्हे की, तुम्ही एखाद्या मंदिरात, मशिदीमध्ये किंवा चर्चमध्ये जाता आणि औपचारिकता म्हणून काही कर्मकांडाचे पालन करता, काही दान देता आणि घरी येऊन काहीही मूर्खपणा करता – तो धर्म नव्हे. समजा, एखाद्या मनुष्यास महान म्हणतात, तेव्हा त्याच्या महानतेचा पुरावा काय? त्याच्याकडे अनंत ऐश्वर्य, ज्ञान, कीर्ती, अमर्याद सौंदर्य इ. असले पाहिजे. त्याचप्रमाणे एखादा मनुष्य धार्मिक तत्त्वांचे पालन करणारा असेल तर त्याचा पुरावा काय? पुरावा हाच की, त्याने भगवद्प्रेम विकसित केले आहे, तो धार्मिक आहे.
कोणी म्हणेल, “हो, माझे परमेश्वरावर प्रेम आहे.” परंतु, त्या प्रेमाचे स्वरूप काय? या जगातील अनुभवानुसार आपण नेहमी पाहतो की, पुरुष एकाद्या सुंदर मुलीवर प्रेम करतो, परंतु किती वेळ? ती सुंदर दिसेपर्यंतच आणि एखादी मुलगी मुलावर किती काळ प्रेम करते? जोपर्यंत त्यांचा खिसा भरलेला आहे तोपर्यंत! ते प्रेम नव्हे, ती वासना आहे. “माझे तुमच्या त्वचेवर प्रेम आहे, तुझ्या पैशावर प्रेम आहे” ते प्रेम नव्हे. येथे भागवत सांगते की, भगवद्प्रेम अहैतुकी – स्वार्थी हेतूरहित असले पाहिजे. “परमेश्वरा, तुम्ही मला रोज माझी मीठ-भाकर पुरविता म्हणून माझे तुमच्यावर प्रेम आहे,” असे नव्हे. चर्चमध्ये, मंदिरात किंवा मशिदीमध्येही लोक सामान्यत: एकाच प्रकारची प्रार्थना करतात : “हे परमेश्वरा, मला रोजची भाकर दे.” भारतात लोक मंदिरात जाऊन प्रार्थना करतात, “हे श्रीकृष्ण, मी संकटात आहे. मला यातून बाहेर काढा.” किंवा, “मला काही पैशांची गरज आहे, तेव्हा कृपया मला एक कोटी रुपये द्या.” हे भगवद्प्रेम नव्हे.
अर्थात, अशा प्रकारचा धर्म नास्तिकवादापेक्षा फार चांगला आहे. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये (7.16) सांगतात, चातुर्विधा भजन्ते मां जना: सुकृतिनोऽर्जुन. जो कोणी भगवंतांकडे जातो आणि काही वर मागतो तो पुण्यवान मनुष्य आहे. परंतु, तो भक्त नव्हे. पुण्यवानांमध्ये त्याची गणना होऊ शकते, कारण त्याने परमेश्वराचे सर्वश्रेष्ठत्व मान्य केले आहे; परंतु त्याने धर्माचे सर्वोच्च तत्त्व, भगवत्प्रेम विकसित केलेले नाही.
भगवान श्री चैतन्य महाप्रभू आपल्या शिक्षाष्टकामध्ये (मंत्र 7) भगवत्प्रेमाचे वर्णन करतात :
युगायितं निमेषेण चक्षुषा प्रावृषायितम्।
शुन्यायितं जगत् सर्वं गोविन्दविरहेण मे॥
“हे गोविंद! मी तुमचे दर्शन घेऊन शकत नसल्यामुळे प्रत्येक क्षण मला बारा वर्षांप्रमाणे भासत आहे.” प्रत्येकाला या भावनेची काहीशी अनुभूती आहे. तुमचे कोणावर प्रेम असेल तर त्यावेळी प्रत्येक क्षण पूर्ण दिवसाप्रमाणे वाटतो. भगवान श्री चैतन्य महाप्रभू श्रीकृष्णांना पाहू शकत नसल्यामुळे ते म्हणतात, चक्षुषा प्रावृषायितम् – “मुसळधार पावसाच्या वर्षावाप्रमाणे माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहात आहेत.” आणि शून्यायितं जगत् सर्वं – “संपूर्ण जगत मला शून्य असल्याचे भासत आहे.” आणि, हे सर्व श्री गोविंदांच्या विरहामुळे होत आहे – गोविन्द विरहेण मे. जेव्हा तुम्हाला श्री गोविंदांपासून विरह असह्य होत असेल तेव्हा ते विशुद्ध, अहैतुकी भगवत्प्रेम असते.
श्रीमद्भागवतामधील या श्लोकामध्ये विशुद्ध भगवत्प्रेमाचे वर्णन करण्यासाठी आणखी एक शब्द वापरला आहे, तो म्हणजे अप्रतिहता – अर्थात “कोणत्याही कारणास्तव खंडित न होता.” काहीवेळा लोक म्हणतात, “मी श्रीकृष्णांवर प्रेम करू शकत नाही, कारण मी अत्यंत गरीब मनुष्य आहे,” किंवा “मी श्रीकृष्णांवर प्रेम करू शकत नाही, कारण मी सुशिक्षित नाही, मी वेदांत तत्त्वज्ञानाचा अभ्यास करू शकत नाही.” नाही, श्रीकृष्णांवर प्रेम करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही भौतिक संपदेची आवश्यकता नाही. तुम्ही केवळ फळे, फुले मंदिरात आणून ते श्रीकृष्णांच्या अर्चाविग्रहाला अर्पण करून तुमचे श्रीकृष्णांवरील प्रेम विकसित करण्यास सुरुवात करू शकता. ते प्रेमाच्या सहा लक्षणांपैकी एक असल्याचे रूप गोस्वामी आपल्या उपदेशामृतामध्ये (श्लोक 4) सांगतात –
ददाति प्रतिगृह्णाति गुह्यमाख्याति पृच्छति।
भुञ्क्ते भोजयते चैव षड्-विधं प्रीतिलक्षणम्॥
प्रथम, तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला एखादी वस्तू भेट दिली पाहिजे आणि तिच्याकडून भेटवस्तू स्वीकारली पाहिजे. जर तुम्ही केवळ भेटवस्तू स्वीकारतच राहिलात परंतु कोणतीही वस्तू भेट दिली नाहीत, तर ते प्रेम नव्हे. नंतर गुह्यमाख्याति पृच्छति – तुम्ही कोणतीही गोष्ट तुमच्या मनात गुह्य ठेवू नये आणि तुमच्या प्रिय व्यक्तीनेही मनामध्ये कोणतीही गोष्ट गुप्त ठेवू नये. आणि, भु्ञ्क्ते भोजयते चैव – आपल्या प्रिय व्यक्तीला काही अन्नपदार्थ द्यावेत आणि त्या व्यक्तीकडून खाद्यपदार्थ स्वीकारावेत. जेव्हा आपण श्रीकृष्णांसह या सहा प्रितीलक्षणांनी संबंध साधतो तेव्हाच विशुद्ध भगवत्प्रेम जोपासतो आणि ते प्रेम कोणत्याही भौतिक हेतूरहित आणि अखंडित असले पाहिजे.
भगवंतांप्रति असे प्रेम विकसित करणे शक्य असेल तर तुम्हाला सुप्रसीदति – संपूर्ण समाधान लाभेल. मग कोणतीच चिंता, असंतोष राहणार नाही. संपूर्ण जगच आनंदाने पूर्ण असल्याचे तुम्हाला वाटेल, विश्वं पूर्ण सुखायते. त्यामुळे जो धर्म तुम्हाला भगवंतांचे प्रेमी कसे बनावे, हे शिकवितो – तो सर्वात्तम धर्म आहे. आणि, सर्वोत्कृष्ट कल्याणकार्य म्हणजे या ज्ञानाचा प्रचार करणे होय. कृष्णभावनामृत संघाचा हाच हेतू आहे. कृष्णभावना ही इतकी अद्भुत गोष्ट आहे की, ती कोणत्याही भौतिक संपदेवर आधारलेली नाही किंवा त्यामध्ये कोणता खंड पडणेही शक्य नाही. जगाच्या कोणत्याही भागामध्ये, घरात किंवा घरापासून दूर तुम्ही ‘हरे कृष्ण’ महामंत्राचा जप करू शकता आणि भावविभोरतेने लवकरच भगवत्प्रेम प्राप्त करू शकता.