READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944
READ ON ANY DEVICE READ OFFLINE SINCE 1944E

टेबल ऑफ़ कंटेंट्स

फिटे अंधाराचे जाळे

मराठी प्रीमियम

3

मिनिटे



-सुबुद्धीराय दास



अंधार म्हणजेच ‘काळोख’ किंवा ‘तिमिर्’. या अंधाराचे खरोखरच एखादे जाळे असू शकते का? आणि, ते असेल तर ते कसे काय सुटू शकेल?



आज जर आपण पाहिले तर सर्वत्र खूप प्रकाशाचा झगमगाट पहावयास मिळतो. प्रत्येक सणावारीला – दिवाळी, दसरा, ख्रिस्मस्, नववर्ष किंवा कोणताही उत्सव असो – झगमगणार्‍या दिव्यांचा लखलखाट सर्वत्र पहावयास मिळतो.



परंतु, प्रकाश आहे तर अंध:कार देखील आहे. किंबाहुना आज प्रकाशाच्या तुलनेत अंध:कार अधिक आहे. हा अंध:कार कोणालाही नको असतो. आजच्या या लेखात आपण खरा अंध:कार कोणता? त्यापासून कसे वाचता येईल? याबाबत जाणण्याचा प्रयत्न करू.



मला आठवते, एकदा अंधाराला घाबरलेली छोटी मुलगी मला म्हणाली, “देवाने हा अंधार बनवलाच कशाला? अंधार नसता तर किती छान झाले असते?



खरोखरच, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. भगवंतांनी अंधार बनविलाच का? तर उत्तर आहे – भगवंतांनी अंधार बनविलेलाच नाही. अंधार म्हणजे केवळ प्रकाशाचा अभाव. प्रकाशाची अनुपस्थिती म्हणजे अंधार. अंधाराला स्वत:चे अस्तित्वच नाही.



पण, या अंधाराचा अनुभव का होतो? जेव्हा आपण प्रकाशापासून विमुख होतो, तेव्हाच अंधार अनुभवयास मिळतो. असा अंध:कार सर्वांना अतिशय भयावह वाटतो, कारण प्रकाशामध्ये सहजपणे करता येणारे कार्य अंधारामध्ये अशक्य वाटायला लागतात. प्रकाशामध्ये सहजपणे वावरणारा व्यक्ती अंधारात एक पाऊलही बिनधास्तपणे पुढे टाकू शकत नाही.



अशा या अंधाराची वैशिष्ट्ये कोणती? आणि, हा अंध:कार किती प्रकारचा असतो? हे आपण जाणून घेऊ.



अंधाराचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही वस्तूला तिच्या वास्तविक स्वरूपापासून लपवून ठेवण्याचे कार्य अंधार करतो. उदाहरणार्थ, प्रकाशामध्ये एखादी गोष्ट स्पष्टपणे पाहता येते; पण तीच गोष्ट अंधारात पाहता येत नाही. याशिवाय, अंधारामध्ये कोणत्याही वस्तूचे खरे स्वरूप न कळता आपण वस्तूला दुसरी कोणतीतरी वस्तू समजतो (जाड दोरखंडाला साप समजणे इत्यादी).



अंधारामध्ये अनुभवली जाणारी गोष्ट एकतर भ्रामक नाहीतर काल्पनिक असते. उदाहरणार्थ, सिनेमागृहात चित्रपट पाहण्यासाठी जातो तेव्हा सिनेगृहातील सर्व दिवे घालविले जातात, जेणेकरून त्या अंधारातच पडद्यावर आपण सिनेमा पाहू शकतो. कारण, प्रकाश असेल तर पडद्यावरची भ्रामक, अवास्तविक छवी आपण पाहू शकणार नाही. याचा अर्थ, सिनेगृहात पूर्ण अंधार असतो, तेव्हा तेथे वास्तविकपणे उपस्थित असलेले लोक पाहू शकत नाही; पण पडद्यावरील काल्पनिक चलचित्रांना पाहू शकतो. तर, हे आहे अंधाराचे वैशिष्ट्य.



अंधार सत्याला आच्छादित करून असत्याला प्रदर्शित करतो. हा अंधार विविध प्रकारचा असतो : प्रकाशाच्या अभावाने होणारा अंधार; अज्ञानाच्या आच्छादनाने निर्माण होणारा अंधार; भयाच्या स्थितीमुळे निर्माण होणारा अंधार; भौतिक इंद्रियतृप्तीच्या इच्छेमुळे चेतनेवर निर्माण होणारा अंधार आणि भगवान श्रीकृष्णांपासून विमुख झाल्याने निर्माण झालेला मायेचा अंध:कार.



प्रकाशाच्या अभावाने निर्माण होणारा अंधार दूर करण्यासाठी आपल्याला प्रकाशाची मदत घ्यावी लागते. ज्ञानाच्या अभावामुळे निर्माण होणारा अज्ञानरूपी अंध:कार. हा आपल्याला वास्तविक परिस्थितीची जाण होऊ देत नाही. अज्ञानामुळे आपण सत्य-असत्य, योग्य-अयोग्य, भ्रम-वास्तविकता यामध्ये भेद करण्यामध्ये असमर्थ होऊन जातो. त्यामुळे आपली निर्णयक्षमता संपुष्टात येते. यामुळे चुकीचे निर्णय घेतल्याने जीवनात दु:ख आणि अशांतीचा अनुभव करतो. हा अज्ञानरूपी अंध:कार दूर करण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे योग्य व्यक्तीकडून खर्‍या ज्ञानाची. हे ज्ञान आपल्याला केवळ प्राचीन वेद, उपनिषदे इत्यादी आध्यात्मिक ग्रंथांमधूनच होऊ शकते. या समस्त वैदिक ग्रंथांचा सार म्हणजे भगवद्गीता. गीता आपणास आपल्या अस्तित्वाचे, या भौतिक जगताचे आणि भगवंतांचेही वास्तविक ज्ञान प्रकाशित करते. अशा प्रकारे भगवद्गीतेच्या रूपातील ज्ञानाच्या किरणांनी आपण अज्ञानाचा अंध:कार दूर करू शकतो.



भयाचा अंध:कार आपल्याला नवीन गोष्टी शिकण्यापासून, उचित कार्य करण्यापासून आणि आवश्यक असलेले निर्णय घेण्यापासून परावृत्त करतो. हा भयाचा अंधार केवळ अभयत्व प्राप्त झाल्याने दूर होतो. आणि, या भौतिक जगात अभयत्व प्राप्त करायचे तर परिपूर्ण अभय प्रदान करणार्‍या भगवंतांच्या चरणकमळांचा आश्रय घेणे अनिवार्य आहे.



या भौतिक जगरूपी मायेचा अंध:कार हा श्रीकृष्णांपासून विमुख झाल्याने पहावयास मिळतो. भगवान श्रीकृष्णांच्या संपर्कामध्ये आपण आध्यात्मिक प्रकाश आणि ऊर्जेचा अनुभव करतो. परंतु, भगवंतांपासून स्वतंत्रपणे भोग करण्याच्या इच्छेने आपले या भौतिक जगात पतन होते आणि परिणामत: अनेक दु:खांना सामोरे जावे लागते.



चैतन्यचरितामृत सांगते,



कृष्ण सूर्यसम माया हय अंध:कार
जहा कृष्ण ताहां नाही मायार अधिकार



भगवान श्रीकृष्ण हे सूर्यासमान प्रकाशमान आहेत. पण, श्रीकृष्णांपासून विमुख होऊन मायेचा आश्रय घेतल्याने आपणास दु:खे अनुभवावी लागतात. एका अंधकारमय खोलीत टोकदार काचेचे तुकडे पडले असतील तर अशा खोलीत चालण्याचा प्रयत्न केल्यास निश्चितच पाय रक्तबंबाळ होईल. त्याचप्रमाणे या भौतिक जगात मायेच्या अंध:कारामुळे लोकांना नानाविध दु:खे भोगावी लागतात. यातून सुटका करायची असेल तर आपण पुन: भगवंतांसम्मुख झाले पाहिजे. भगवंतांसम्मुख होताच आपण प्रकाशित स्थित होऊ आणि आपली मायेच्या अंध:कारातून आपोआपच मुक्तता होईल.



म्हणून वैदिक साहित्यामध्ये सांगितले आहे, तमसो मा ज्योतिर्गमय: – अंधारापासून प्रकाशाकडे जा. अर्थात, आपण अज्ञानरूपी अंध:कारापासून ज्ञानरूपी प्रकाशाकडे वाटचाल केली पाहिजे. श्रीमद्भागवत, श्रीमद्भगवद्गीतेसारखे वैदिक ग्रंथ आपणास भगवंतांविषयी यथोचित माहिती पुरवितात. यातील ज्ञानाचा आश्रय घेऊन आपण अज्ञानरूपी अंध:कारायवर विजय प्राप्त केला पाहिजे. या ज्ञानाच्या आधारे भौतिक इंद्रियतृप्तीच्या प्रलोभनांना बळी न पडता भगवंतांचा आश्रय घेऊन भक्तिमय सेवेत संलग्न होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.



ज्ञानप्राप्ती आणि सेवेतील संलग्नता कशी प्राप्त होईल? त्यासाठी एक सुंदर तत्त्व भगवान श्रीकृष्णांनी प्रदान केलेले आहे – गुरुतत्त्व.



ॐ अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया।
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नम:॥



“अज्ञानरूपी अंध:कार दूर करून ज्ञानरूपी किरणांद्वारे आपले नेत्रचक्षू उघडणार्‍या श्री गुरूंना मी प्रणाम करतो.” आध्यात्मिक गुरू हे भगवंतांप्रति सम्मुख होण्यासाठी, भक्तिमय सेवेत संलग्न होण्यासाठी मार्गदर्शन करतात. अशा गुरूंच्या आश्रयाखालीच आपण मायारूपी अंध:कारातून भगवद्भक्तीरूपी प्रकाशाकडे वाटचाल करू शकतो.



श्री नित्यानंद प्रभू हे गुरुतत्त्वाचे प्रतिनिधीत्व करतात. कलियुगात स्वत: श्रीकृष्ण आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू, श्री बलरामजी हे श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभूंच्या रूपात अवतरित झाले आहेत. श्री नित्यानंद प्रभूंच्या रूपात भगवंत या भौतिक जगातील अंध:कारामध्ये चाचपडणार्‍या बद्ध जीवांना भगवद्भक्तीकडे नेण्यासाठी अविरत प्रयत्न करतात आणि त्यांच्या प्रयत्नांनीच ब्रह्म-मध्व-गौडीय गुरुशिष्य परंपरेमध्ये पुढे श्रील प्रभुपादांनी भगवद्भक्तीच्या प्रकाशाचा वर्षाव संपूर्ण विश्वावर केला. यामुळे लाखो लोकांनी भगवद्भक्तीचा स्वीकार करून मायेच्या अंध:कारावर मात केली आहे.



तर आपण देखील या भगवद्भक्तीचा, वैदिक ग्रंथांचा स्वीकार करून श्रीगुरूंच्या निर्देशानुसार मार्गक्रमण करून आपले जीवन प्रकाशमान करून मोहमायारूपी अंध:काराचे जाळे तोडुया!



सुबुद्धिराय दास (डॉ. संदिप लोखंडे) हे प. पू. राधानाथ स्वामींचे शिष्य आहेत. ते संभाजीनगर येथील प्रसिद्ध दंतरोग तज्ञ आहेत. आपल्या व्यवसायाबरोबर ते कृष्णभक्तीचा प्रचार देखील करतात.

Spread the love

टेबल ऑफ़ कंटेंट्स

रिलेटेड आर्टिकल

Explore Other Articles

Scroll to Top